मुंबई : राज्यामध्ये शुक्रवारी 1 मे पासून राष्ट्रीय जनगणनेच्या पहिल्या टप्प्याची सुरुवात होणार आहे. त्यासाठी प्रथमच स्वःगणनेचा ऐच्छिक पर्याय उपलब्ध करुन देण्यात आला आहे. 1 मे ते 15 मे या काळात https://se.census.gov.in या पोर्टलवरुन आपल्या घराची कौटुंबिक माहिती यामध्ये भरता येणार आहे.
तसेच 16 मे ते 14 जून या कालावधीमध्ये घरगणना करण्यासाठी जनगणना अधिकारी घरोघरी येणार आहेत, अशी माहिती राज्याच्या मुख्य प्रधान जनगणना अधिकारी डॉ. निरुपमा डांगे यांनी गुरुवारी (ता. 30 एप्रिल) पत्रकार परिषदेत दिली. ज्यांनी स्वःगणना केलेली आहे त्यांच्या अर्जाची पडताळणी देखील केली जाणार आहे. ज्यांनी स्वगणना केली नसेल त्यांचा अर्ज भरुन घेतला जाणार आहे.
जनगणनेच्या दुसऱ्या टप्प्यात (फेब्रुवारी 2027) जातनिहाय जनगणना करण्याचे प्रस्तावित असल्याची माहिती डॉ. डांगे यांनी दिली. जनगणेनसाठी गोळा करण्यात आलेली वैयक्तिक माहिती ही पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात येणार असून ती पोलीस, न्यायालयीन तपासणी, माहितीचा अधिकार किवा सरकारी पडताळणीसाठी वापरली जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, जनगणनेसाठी स्वतःहून पुढे येऊन माहिती दिली जावी, असे आवाहन त्यांनी केले.
प्रथमच प्रत्येक व्यक्तीला स्वःगणनेचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला असून एकूण 33 प्रश्नांची माहिती अर्जामध्ये भरावी लागणार आहे. एका घरातील एकाच व्यक्तीने स्वःगणनेची माहिती भरायची असल्याने कुटुंबातील सर्व सदस्यांना स्वःगणनेची माहिती भरता येणार नसल्याचे डॉ. डांगे यांनी सांगितले. स्वःगणना करताना नोंदणीकृत मोबाईल नंबर किंवा ई-मेलवर स्वःगणना आयडी प्राप्त करून ही माहिती भरता येणार आहे. स्वःगणनेदरम्यान कोणतीही कागदपत्रे पोर्टलवर अपलोड करण्याची आवश्यकता नसल्याची माहिती यावेळी देण्यात आली. जनगणना प्रगणक जेव्हा घरी भेट देतील, तेव्हा स्वःगणनेद्वारे नोंदविलेल्या माहितीची पडताळणी, पुष्टीकरण आणि अंतिम सादरीकरणासाठी त्यांना स्वःगणना आयडी देणे आवश्यक असेल, असेही जनगणना अधिकारी डॉ. निरुपमा डांगे यांनी सांगितले आहे.

