मुंबई : दिवंगत नेते अजित पवार यांचे 28 जानेवारी 2026 रोजी विमान अपघातात निधन झाले. त्यानंतर गेल्या दोन महिन्यात अनेक राजकीय घडामोडी घडल्याच्या पाहायला मिळाल्या. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री झाली आणि त्यानंतर त्यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून देखील निवड करण्यात आली.
मात्र आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात फुट पडल्याची चर्चा रंगताना दिसत आहे. तसेच सुनेत्रा पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते प्रफुल पटेल व प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यात काही आलबेल नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. सुनेत्रा पवार आज (02 एप्रिल) दिल्ली दौऱ्यावर असताना देखील दोन्ही नेते अनुपस्थित असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मात्र प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यासंदर्भात समोर येणाऱ्या बातम्यांवरून अजित पवार यांचे पुत्रे तथा खासदार पार्थ पवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
पार्थ पवार यांनी X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करताना म्हटले की, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना लक्ष्य करणारे निराधार अहवाल आणि केवळ तर्कवितर्कांवर आधारित कथा म्हणजे निव्वळ कल्पित कथाच आहेत. त्यांची अनेक दशकांची अढळ निष्ठा आणि नेतृत्व आम्हा सर्वांना आजही मार्गदर्शित करत आहे. अशा ज्येष्ठ नेत्यांना हेतुपुरस्सर निर्माण केलेल्या वादांमध्ये ओढणे अत्यंत दुर्दैवी असून, या गोष्टीचा तीव्र शब्दांत निषेध व्हायलाच हवा, असे म्हणत पार्थ पवार यांनी संताप व्यक्त केला आहे.

