बऱ्याचदा घरांमध्ये स्वयंपाक करताना अन्न कमी पडते किंवा जास्त होऊन वाया जाते. अन्न वाया जाणे हा केवळ धान्याचा अपव्यय नाही, तर पैशांचेही नुकसान आहे. यासाठी रोजच्या जेवणाचा परफेक्ट अंदाज असणं आवश्यक आहे.
जेवणाचं योग्य प्रमाण माहीत असेल तर अन्नाची नासाडी टाळता येते आणि स्वयंपाकही उत्तम होतो. आज आपण रोजच्या जेवणाचा परफेक्ट अंदाज कसा घ्यायचा हे पाहूयात.
प्रत्येक व्यक्तीच्या खाण्याची पद्धत आणि प्रमाण वेगळं असतं. ताटात एखादी आवडीची भाजी असल्यास व्यक्ती दोन घास जास्त खाते तर आवडीची नसेल तर कमी जेवते. असं सर्व असलं तरी एका सरासरी प्रौढ व्यक्तीसाठी पुढीलप्रमाणे अंदाज घेता येईल.
भात - एका माणसासाठी अंदाजे 1/4 कप तांदूळ पुरेसं असतात. आता वेगवेगळ्या तांदळाप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता. जर घरात 4 जण राहत असतील तर 1 कप तांदूळ पुरेसा असतो.
डाळ - एका माणसासाठी 3 ते 4 मोठे चमचे कच्ची डाळ डाळ पुरेशी होते.
चपाती - एका माणसासाठी 2 ते 3 चपात्या पुरेशा असतात. 4 लोकांसाठी 3 कप पीठ पुरेसं होतं.
मापाची वाटी
अंदाज सतत चुकत असेल तर स्वयंपाकघरात प्रमाणित वाटी ठरवता येईल म्हणजेच, तांदूळ, डाळ, पोळीचे पीठ मोजण्यासाठी नेहमी त्याच वाटीचा वापर करा. या ट्रिकमुळे तुम्हाला परफेक्ट अंदाज येईल.
भांड्याचे माप
जेवण बनवताना पातेल्याच्या कडेला असणाऱ्या रेषा किंवा उंचीवरून ओळखा की हे जेवण आजच्या दिवसासाठी पुरेसं आहे.
मसाले -
चव बिघडू नये म्हणून मसाल्यांसाठी नेहमी लहान चमचा वापरण्याची सवय ठेवावी. ज्या दिवशी भाजी बरोबर होईल ते प्रमाण लक्षा ठेवा. तुम्ही लिहूनही ठेवू शकता.
मीठाचा अंदाज -
4 लोकांच्या जेवणात साधारण भाजीमध्ये 1 ते 1.5 लहान चमचा मीठ लागतं. तसेच पोळीच्या पिठात 4 लोकांसाठी अर्धा लहान चमचा मीठ पुरेसं होतं.
अंदाजापेक्षा जास्त -
नेहमी घरातील सदस्यांच्या संख्येपेक्षा 10% जास्त जेवण बनवावं. यामुळे अचानक कोणी आले किंवा एखाद्याला भूक जास्त असली तरी अन्न कमी पडत नाही.
अशा प्रकारे वाटी आणि चमच्याचे परफेक्ट माप वापरल्यास स्वयंपाकाचा अंदाज अचूक येतो आणि अन्नाचा अपव्यय टळतो.

