दिल्ली : थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि निवडणूक आयोगाला आव्हान देणाऱ्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या आक्रमकपणामुळे बहुचर्चित ठरलेल्या पश्चिम बंगालच्या निवडणुकीचा निकाल सोमवारी जाहीर करण्यात आला.
पंतप्रधान मोदींनी अत्यंत निकराने पश्चिम बंगालमध्ये प्रचाराचा झंझावत राबवला. या झंझावाताने भगवे वादळ घोंघावले अन् १५ वर्षांपासून अभेद्य राहिलेला तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांचा बालेकिल्ला ढासळला.
२९४ पैकी २०६ जागा भाजपने जिंकल्या. तर, तृणमूल काँग्रेस ८१ वर थांबली. ममता बॅनर्जींनाही १५ हजार १०५ मतांच्या फरकारने सुवेंदू अधिकारी यांनी पराभवाची धूर चारली आहे. ममता बॅनर्जींच्या आणि तृणमूलच्या पराभवानंतर काँग्रेसच्या नेते आणि कार्यकर्त्यांकडून आनंद व्यक्त केला जात आहे. यावरून काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि विरोधी पक्षनेते, राहुल गांधी यांनी नाराजी व्यक्त करत काँग्रेस कार्यकर्त्यांनाच सुनावलं आहे.
फाईल्स गहाळ होता कामा नये, भाजपचा विजय होताच पश्चिम बंगालमध्ये मुख्य सचिवांचा आदेश
'एक्स' अकाउंटवर ट्विट करत राहुल गांधी म्हणाले, "काँग्रेसमधील काही नेते आणि इतर लोक तृणमूल काँग्रेसच्या पराभवावर आनंद व्यक्त करत आहेत. या लोकांनी एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की, आसाम आणि बंगालमधील जनमताची चोरी हे लोकशाही नष्ट करण्यासाठी भाजपच्या मोहिमेतील एक मोठे पाऊल आहे. राजकीय मतभेद बाजूला ठेवा. हा प्रश्न केवळ एका किंवा दुसऱ्या पक्षाचा नाही. हा प्रश्न आपल्या देशाचा म्हणजेच भारताचा आहे."
अशाच प्रकारे शिवसेना ( ठाकरे गट ) नेत्या, माजी खासदार प्रियंका चुतुर्वेदी यांनीही ट्विट करत नाराजी व्यक्त केली आहे. चतुर्वेदी म्हणाल्या, "इंडिया आघाडीतील घटक पक्ष असलेल्या टीएमसी आणि डीएमकेच्या अपयशावर आघाडीतूनच टोमणे मारले जात आहेत. हे पाहून लाज वाटते. अशाच फुशारक्या अरविंद केजरीवाल आणि तेजस्वी यादव पराभूत झाल्यावर आणि आपमध्ये फूट पडल्यावरही मारण्यात येत होत्या. आता उत्तर प्रदेशमध्ये निवडणूक होत आहे. या लोकांनी अखिलेश यादव यांना टार्गेट करण्याचं ठरवलं आहे."
"आपल्यातील हेच मतभेद मतदार नाकारतात आणि भाजप त्याचा फायदा घेतो. २०२४ मध्ये कोणताही एक पक्ष विरोधकांचे नेतृत्त्व करत नव्हता. सगळे पक्ष एकत्रित होते. त्यामुळे सुरू असलेले प्रकार थांबवा आणि ज्या भावनेतून इंडिया आघाडी स्थापन झाली, त्याची आठवण ठेवा," असे चतुर्वेदींनी म्हटलं आहे.
मोदींनी जरा भान ठेवून बोललं पाहिजे, संजय राऊत कशामुळे पंतप्रधानांवर चिडले?

