64 कलांचा अधिपती असलेला श्री गणेश प्रथमपुजनीय आहे. गणेशाची उपासना केल्यामुळे उत्तम बुद्धी प्राप्त होते, संकटापासून मुक्ती मिळते असे म्हणतात. गणपतीचा वार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मंगळवारी भक्त उपवास करतात, त्याची आराधना करतात.
यासोबत दर महिन्याला येणाऱ्या संकष्टीचे व्रतही पाळतात. संकष्टी दर महिन्याला येते. परंतू, हिंदू धर्मात संकष्टी चतुर्थी इतकं महत्त्वाची का मानली जाते. आजच्या लेखात आपण संकष्टी चतुर्थीचे महत्त्व काय आहे आणि एप्रिल महिन्यात संकष्टी नक्की कधी आहे जाणून घेऊयात
संकष्टी चतुर्थी ही हिंदू धर्मातील एक महत्वाची उपासना आहे, संकष्टी चतुर्थीचा अर्थ म्हणजे संकट दूर करणारी चतुर्थी. चतुर्थीला गणपतीची आराधना केल्यास संकटे, अडथळे, आर्थिक अडचणी आणि मानसिक त्रास दूर होतो असं हिंदू धर्मात सांगितलं आहे. या दिवशी व्रत करून संध्याकाळी गणेशाची पूजा करून त्याला मोदकांचा नैवेद्य अर्पण केला जातो. व्रत करताना बाप्पाकडे प्रतिकुल परिस्थितीत मानसिक भान राखणं आणि योग्य निर्णय घेणं यासाठी आशीर्वाद मागितले जातात. मानसिक शांती साधण्यासाठी लाखो भाविक यादिवशी गणेशाची आराधना करतात. या दिवशी उपवास करून, गणपती स्तुती ऐकतात, मंत्र जपतात आणि नैवेद्य अर्पण करतात. त्यामुळे या व्रताला आध्यात्मिक तसेच मानसिक दृष्टिकोनातून मोठे महत्त्व आहे.
कधी आहे चतुर्थी ?
वैशाख महिन्यातील कृष्ण चतुर्थी तिथीची सुरुवात रविवार, 5 एप्रिल रोजी सकाळी 11:59 वाजता होणार आहे आणि या तिथीची सांगता 6 एप्रिल रोजी दुपारी 2:10 वाजता होईल. त्यामुळे उदयतिथीनुसार संकष्टी चतुर्थी रविवार 5 एप्रिल रोजी आहे.
चंद्रोदयाची वेळ
वैशाख संकष्टी चतुर्थीला चंद्रोदय रात्री 9.58वाजता आहे.
उपवास कसा सोडावा?
- संकष्टीचा उपवास सोडण्यापूर्वी चंद्रोदयाची वेळ पाहून चंद्र दर्शन घ्यावे.
- चंद्राला पाणी अर्पण करावे.
- हळद-कुंकू वाहावे.
- दिवा आणि अगरबत्तीने ओवाळावे.
- चंद्राला नमस्कार करावा, त्यानंतर गणेशाचे दर्शन घ्यावे.
- दुर्वा, फुले गणेशाला वाहावीत.
- मोदकांचा नैवेद्य दाखवावा आणि मनोभावे प्रार्थना करावी.

