औरंगाबाद नामांतराच्या मुद्यावरून सध्या महाविकास आघाडी सरकारमधील काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात 'सामना' सुरू आहे. सरकार अडचणीत येईल इतकं ताणू नका, असा ज्येष्ठत्वाचा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी दिला आहे.
नाशिक येथे रस्ता सुरक्षा अभियनाच्या उद्घाटनप्रसंगी ते पत्रकारांशी बोलत होते. शिवसेनेचं मुखपत्र 'सामना'तील लेखातून औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्यावर भाष्य करताना संजय राऊत यांनी काँग्रेसवर टीका केली होती. औरंगजेबाच्या इतिहासाची उजळणी करत इतिहास पुन्हा वाचण्याचा सल्लाही दिला होता. राऊत यांच्या या टीकेला थोरात यांनी एका ट्वीटच्या माध्यमातून जोरदार उत्तर दिले.
भाजपने मनचिंतन करावे
ग्रामपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडी सरकारला मतदारांनी पसंती दर्शवली ही आनंदाची गोष्ट आहे. तीन पक्षांनी सरकार स्थापन केले असले तरी लोकांनी ते स्वीकारले आहे हे दिसून येते. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, राधाकृष्ण विखेंना आपल्या गावात विजय मिळवता आलेला नाही याबाबत बोलताना ते म्हणाले, मी टीका करणार नाही. त्यांनी स्वतःहून विचार करावा. त्यांच्या पक्षाने मनचिंतन आणि मतचिंतन करावे, असा सल्ला त्यांनी दिला.

