अमरावती : शेतकरी कर्जमाफीचा प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत सादर करून त्याला मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून 30 सप्टेंबर 2025 रोजी पीककर्ज थकित असलेल्या पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी दिली जाणार आहे.
परंतु, विधान परिषद निवडणुकीमुळे हा निर्णय सरकारकडून आता जाहीर करण्यात येणार नसून निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार या निर्णयाची निवडणुकीनंतर घोषणा करण्यात येणार आहे. दरम्यान, शेतकरी कर्जमाफीच्या निर्णयावर शिवसेना नेते आणि आमदार बच्चू कडू यांनी अमरावतीमध्ये माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे.
बच्चू कडू म्हणाले की, आज कर्जमाफीचा निर्णय झाला त्याबद्दल मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि खास करून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानतो. जो-जो कार्यकर्ता या लढाईत सहभागी झाला होता, त्यांचे सुद्धा मी आभार मानतो. कर्जमाफीची लढाई आम्ही जिंकली. पण प्रोत्साहन पर जो निधी 50 हजार आहे, तो एक लाख करावा यासाठी बच्चू कडूचा लढा कायम राहील, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच बच्चू कडू म्हणाले की, ही कर्जमाफी माझ्या शेतकऱ्यांच्या खात्यापर्यंत आणि त्याच्या घराचे आयुष्य बदलणारी राहील, अशी आशा व्यक्त करतो. परंतु केवळ कर्जमाफी करून चालणार नाही, तर हमी भावाच्या लढाईतसुद्धा माझा शेतकरी उभा राहिल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा बच्चू कडू यांनी दिला.
शेतकरी कर्जमाफीला मान्यता
दरम्यान, राज्यातील शेतकऱ्यांसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना मुख्यमंत्री फडणवीस यांनी अंर्थसंकल्पातून जाहीर केली होती. या अंतर्गत 30 सप्टेंबर 2025 रोजी पीककर्ज थकित असलेल्या पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी दिली जाणार आहे. जे शेतकरी नियमितपणे कर्जफेड करतात त्यांना 50 हजार रुपयांचे प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. त्यानुसार, आज कर्जमाफीचा प्रस्ताव सादर करुन त्याला मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. परंतु, विधान परिषद निवडणुकीमुळे हा निर्णय सरकारकडून आता जाहीर करण्यात येणार नसून निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार या निर्णयाची निवडणुकीनंतर घोषणा करण्यात येणार आहे.

