दिल्ली : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यानंतर पुन्हा एकदा 'ऑपरेशन टायगर' सुरू झाल्याची चर्चा होती. यात ठाकरेंच्या शिवसेनेचे आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार शिंदे शिवसेनेच्या गळाला लागल्याचं बोललं जात होते.
मात्र, भाजपकडून रेड सिग्नल मिळाल्याने 'ऑपरेशन टायगर' थंड बस्त्यात पडलेलं. त्यातच आता ठाकरेंच्या शिवसेनेच्या खासदारांच्या एका कृतीने पुन्हा एकदा 'ऑपरेशन टायगर' सुरू झाल्याचे बोललं जात आहे.
ठाकरेंच्या सेनेचे दोन खासदारांनी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या दिल्लीतील घरी आयोजित करण्यात आलेल्या डिनरला हजेरी लावली होती. यात नांदेडचे खासदार नागेश पाटील आष्टीकर आणि यवतमाळ-वाशिमचे खासदार संजय देशमुख यांचा समावेश आहे. नागेश पाटील आष्टीकर आणि संजय देशमुख यांनी प्रतापराव जाधव यांच्या स्नेहभोजनाला हजेरी लावल्याने खासदार शिंदेंच्या शिवसेनेच्या गळाला लागले काय? अशी चर्चा रंगली होती.
विधान परिषदेच्या जागांसाठी भाजपमधील नेत्यांकडून लावली जातेय 'फिल्डिंग', कोण-कोण इच्छुक?
मात्र, आता नागेश पाटील आष्टीकर यांनी स्वत:हून स्पष्टीकरण दिलं आहे. दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलताना नागेश पाटील आष्टीकर म्हणाले, "कुणीही खासदार नाराज नाही. प्रतापराव जाधव यांच्या लग्नाचा वाढदिवस होता. जाधव यांच्याकडून स्नेहभोजनासाठी निमंत्रम आल्याने आम्ही गेलो होतो. आम्ही काही केले नाहीतर, भीती कशाला बाळगली पाहिजे. त्यामुळे फोटो सोशल मीडियावर टाकले. आम्ही लपवून गेलो नाही. शुभेच्छा दिल्यानंतर फोटो काढणार. मला काही गैर वाटत नाही. भैटीदरम्यान राजकीय कुठल्याही प्रकारची चर्चा झाली नाही."
"यासंबंधी आम्हाला पक्षातून कुणाचाही फोन आला नाही. फक्त माध्यमांमध्ये चर्चा आहे. १० मिनिटांत काय बोलणे होणार आहे? मला काय मोहीत करणार आहेत का? किडनॅप करणार आहेत? कोणत्याही वेगळ्या विषयावर चर्चा झाली नाही," असं नागेश पाटील आष्टीकर यांनी सांगितलं आहे.
"उद्धव ठाकरे आमच्याशी बोलतात. आमच्या संपर्कात असतात. आम्ही वाटेल तेव्हा त्यांना जाऊन भेटतो," असेही नागेश पाटील आष्टीकर यांनी म्हटलं.
राष्ट्रवादी, शिंदेसेना भाजपात लवकरच विलीन होणार, संजय राऊतांचा दावा; सुनावणीवरही भाष्य

