चेन्नई : तामिळनाडू विधानसभेचा 4 मे रोजी निकाल लागला आणि संपूर्ण देशातील राजकारणात या निकालाची जोरदार चर्चा रंगली. कारण, या राज्यातील लोकांनी गेल्या 10 वर्षांपासूनची एम. के. स्टॅलिनची सत्ता उलथवून लावली आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे, या निवडणुकीत मतदारांनी स्टॅलिन यांचाही पराभव करत त्यांना घरचा रस्ता दाखवला. महत्त्वाची बाब म्हणजे, अवघ्या दोन वर्षांपूर्वी म्हणजे, 2024 मध्ये अभिनेता विजय यांनी स्थापन केलेल्या तमिळगा वेत्री कझगम अर्थात TVK या पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्याने आता तामिळनाडूत विजय यांच्या नेतृत्वातील सरकार स्थापन होणार आहे. विजय यांच्या टीव्हीकेला या निवडणुकीत 108 जागा मिळाल्या आहेत. परंतु, त्यांना सत्ता स्थापनेसाठी अजूनही 10 जागांची गरज आहे. त्यातही आता त्यांना काँग्रेसने पाठिंबा दिला असून काँग्रेसचे 5 आमदार टीव्हीकेला पाठिंबा देत आहेत. त्यामुळे आता त्यांना केवळ तीन जागांची आवश्यकता आहे.
परंतु, एकीकडे ही राजकीय जुळवाजुळव होत असताना दुसरीकडे मात्र, अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम अर्थात अण्णाद्रमुक पक्षातील 47 विजयी आमदारांपैकी 30 आमदार हे फुटीच्या उंबरठ्यावर असल्याची माहिती समोर आली आहे. कारण, या पक्षातील 30 आमदारांनी विजय यांच्या टीव्हीके पक्षाला पाठिंबा देण्याची तयार दर्शवली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, 30 हून अधिक आमदार पक्षातून बाहेर पडून विजय यांना आपला पाठिंबा जाहीर करण्यास सज्ज असल्याचे सांगण्यात येत असून या फुटणाऱ्या आमदारांचे नेतृत्व सी.व्ही. षण्मुगम हे करत आहेत. मात्र, अण्णाद्रमुकच्या एका गटाची ही खेळी म्हणजे, काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी तर खेळण्यात येत नाहीये ना? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
तामिळनाडूमध्ये द्रविड मुनेत्र कडगम म्हणजेच डीएमके या पक्षाने काँग्रेससोबत आघाडी करत निवडणूक लढवली होती. सत्ताधारी असलेल्या डीएमकेला यावेळी मतदारांनी दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष बनवत केवळ 59 जागांवर विजय मिळवून दिला, तर काँग्रेसचे पाच उमेदवार विजयी झाले. तर भाजपने अण्णाद्रमुक पक्षासोबत निवडणूक लढवली. त्यातील अण्णाद्रमुक पक्षाला केवळ 47 जागांवर तर भाजपला फक्त आणि फक्त एका जागेवर विजय मिळवता आला. मात्र, पहिल्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या थलपती विजय यांच्या टीव्हीकेने तब्बल 108 जागांवर मोठा विजय मिळवला. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत थलपती असलेल्या विजय यांनी राजकारणातही तेच थलपती असल्याचे दाखवून दिले. मात्र, काँग्रेसने डीएमकेसोबत निवडणूक लढवूनही कोणताही मागचा पुढचा विचार न करता भाजपने कोणतीही खेळी खेळण्याआधी टीव्हीकेला पाठिंबा जाहीर केला. मात्र, आता अण्णाद्रमुकमधील जे 30 आमदार फुटीच्या उंबरठ्यावर चर्चा असल्याची सुरू आहे, त्यांना भाजपने तर ही खेळी खेळण्यास सांगितले नाही ना, अशी चर्चा रंगली आहे.
देशात झालेल्या पाच राज्यांच्या निवडणुकीत भाजप तीन राज्यात क्लीअर विन म्हणजेच बहुमत मिळवत सत्ता स्थापन करणार आहे. तर काँग्रेसला केवळ केरळ या एका राज्यात बहुमत मिळाल्याने त्यांची त्या राज्यात सत्ता स्थापन होणार आहे. परंतु, तामिळनाडूतील मतदारांनी डीएमके, AIADMK म्हणजेच अण्णाद्रमुक, भाजप किंवा काँग्रेसला सत्तेत आणलेले नाही. तमिळवासियांनी विजय यांच्या पक्षाला दिलेले बहुमत लक्षात घेता काँग्रेसने स्मार्ट मूव्ह करत त्यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे भाजपला यामुळे थोडाफार का असेना पण धक्का बसला आहे. ज्यामुळे इतर राज्यात (उदा… महाराष्ट्र, बिहार, गोवा) भाजपने खेळी खेळत काँग्रेसला सत्तेपासून कशा पद्धतीने दूर ठेवले आहे, तसाच काहीसा प्रयत्न त्यांच्याकडून तामिळनाडूत करण्यात येऊ शकतो आणि ज्यामुळे अण्णाद्रमुकमधील एक गट बाजूला करून त्यांना विजय यांच्या गोटात सामिल करून काँग्रेसला पूर्णपणेच बाजूला करण्याचा प्रयत्न तर भाजप करत नाहीये ना? असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. ज्याची जोरदार चर्चा सुरू आहे.
भाजपची खेळी…
महाराष्ट्रात भाजपने शिवसेना आणि राष्ट्रवादी असे दोन प्रमुख प्रादेशिक पक्ष फोडून आपली सत्ता आणली आहे. याची सर्वांनाच माहिती आहे. 2019 मध्ये शिवसेना - भाजपला बहुमत मिळालेले असतानाही त्यावेळी उद्धव ठाकरेंनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसशी हातमिळवणी करत महाविकास आघाडी स्थापन केली आणि राज्यात मविआचे सरकार आणले. परंतु, हा घाव भाजपच्या जिव्हारी लागला. त्यामुळे त्यांनी 2022 मध्ये शिवसेनेतील एक गट म्हणजेच, एकनाथ शिंदेंचा गट फोडला आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील मविआचे सरकार उलथवून लावत भाजप - शिवसेना शिंदे गटाचे सरकार आणले. तर, 2023 मध्ये भाजपमध्ये पहाटेच्या शपथविधीचा बदला घेत राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवारांच्या नेतृत्वातील गट फोडला आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला एकटे पाडले. म्हणजेच काय तर त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांना सत्तेपासून दूर ठेवले त आजतागायत कायम राहिले आहे. सध्या देशातील 22 राज्यांमध्ये भाजपची सत्ता आहे. तर, ज्या ठिकाणी भाजपची सत्ता नाही, तिथे आपली सत्ता आणण्यासाठी मोदी आणि शहा पुरेपूर प्रयत्न करत आहेत. ज्यामुळे अण्णाद्रमुकमधील एक गट विजय यांच्या गोटात सहभागी करून टीव्हीकेला पाठिंबा देणाऱ्या काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी भाजप हा डाव टाकून खेळी तर खेळत नाहीये ना? याबाबतची जोरदार चर्चा आता राजकीयय वर्तुळात रंगली आहे.

