नवी दिल्ली : पश्चिम बंगालमध्ये नुकतेच सत्तापरिवर्तन झाले. विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपने 15 वर्षांच्या तृणमूल काँग्रेसची सत्ता उलथून लावली. एकूण 294 जागांपैकी भाजपने बहुमताचा आकडा पार करत 206 पेक्षा जास्त जागांवर बाजी मारली.
या विजयामुळे राज्यात पहिल्यांदाच भाजपचे सरकार स्थापन झाले आणि शुभेंदू अधिकारी यांचे सरकार आले. अशामध्ये अद्याप या राज्यातील कायदा व सुव्यवस्थेबद्दल अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. शनिवारी, 30 मे रोजी सोनारपूर येथे तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्यावर संतप्त जमावाकडून भीषण हल्ला करण्यात आला. निवडणुकीनंतर झालेल्या हिंसाचारातील पीडित कुटुंबांची भेट घेण्यासाठी ते सोनारपूर येथील कमराबाद भागात गेले असता ही घटना घडली.
समोर आलेल्या माहितीनुसार, खासदार अभिषेक बॅनर्जी हे कुटुंबाला भेटायला गेले असताना भाजप कार्यकर्त्यांनी त्यांना घेरले आणि घोषणाबाजी करत त्यांच्यावर हल्ला केला. लोकांनी त्यांच्यावर दगड, चपला आणि अंडी फेकली. तसेच, त्यांना धक्काबुक्की करत त्यांचा शर्टही फाडला. यावेळी, पोलिसांनी त्यांना हेल्मेट घालून घटनास्थळावरून बाहेर काढण्यात आले. यानंतर माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले की, "त्यांनी माझ्यासोबत काय केले? हे सर्वांनी पाहिले आहे. हे सर्व पूर्वनियोजित होते. या परिसरात पोलिस नाहीत. त्यांना मला मारायचे आहे. हेल्मेटमुळे माझे डोके वाचले. तरीही आम्ही अशा हल्ल्यांना घाबरणार नाही." अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. "ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. मी या घटनेबाबत उच्च न्यायालयात दाद मागणार आहे आणि राज्यपालांनाही याची माहिती देईन. जोपर्यंत स्थानिक पोलिस आपले दल पाठवून पीडितांच्या कुटुंबीयांना सुरक्षा देत नाहीत, तोपर्यंत मी हे ठिकाण सोडणार नाही." असा इशारा टीएमसीचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी दिला आहे. या आंदोलनात हातात अंडी देऊन महिलांना पुढे करण्यात आल्याचा दावाही यावेळी करण्यात आला. तसेच, तिथे उपस्थित जमावाने चोर-चोर अशा घोषणा दिल्या. याच दरम्यान संतप्त जमावाने रस्त्यावर दोन बाईकही फेकून दिल्या, कपडे फाडले, ज्यामुळे तिथे एकच गोंधळ उडाला.
यावेळी स्थानिक लोकांनी माध्यमांना सांगितले की, आम्ही कामगार आहोत, आम्ही कोणत्याही पक्षाचे नाही. आमच्या भागातील रस्ता कधीच तयार झाला नाही. जितका पैसा आला, तो सगळा खाऊन टाकला. आम्ही आजही त्रस्त आहोत, म्हणूनच हा संताप आहे. आम्ही भाजपचे नसून इथे राहणारेच रहिवासी आहोत. जेव्हा ममता बॅनर्जी मुख्यमंत्री होत्या, तेव्हा त्यांच्याकडे रस्ते दुरुस्त करावेत आणि पाणी पुरवठा व्यवस्था सुधारावी म्हणून अनेकदा विनंत्या आणि अर्ज करण्यात आले होते. पण, लोकांचा असा आरोप आहे की त्यांच्या समस्यांकडे कधीच लक्ष दिले नाही. दरम्यान, सोनारपूर हे एक अत्यंत संवेदनशील क्षेत्र मानले जाते. याठिकाणी अनेकदा टीएमसी आणि भाजपमध्ये अनेकदा वाद झाले आहेत. मे महिन्यात सोनारपूरच्या कामराबाद नस्करपाडा परिसरात भाजप कार्यकर्ते सौमेन दास यांच्या घराला आग लावण्यात आली होती. त्यांनी स्थानिक टीएमसी कार्यकर्त्यांवर आधी धमकी देऊन नंतर घर जाळल्याचा आरोप केला होता. यानंतर टीएमसी कार्यकर्ते संजू कर्माकर यांची हत्या झाली होती.

