नवी दिल्ली : पश्चिम बंगालमध्ये भाजपने इतिहास रचला आहे. ममता बॅनर्जी यांच्या 15 वर्षांच्या सत्तेचा पराभव करत पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. भाजपने 293 जागांपैकी 207 जागांवर विजय मिळवला तर तृणमूल काँग्रेसच्या वाट्याला फक्त 80 जागा आल्या.
तेच काँग्रेसला दोन जागांवर समाधान मानावे लागले. अशामध्ये पश्चिम बंगालमध्ये भाजपची सत्ता येताच मुख्य सचिवांनी एक महत्त्वाचा आदेश जरी केला आहे. त्यांनी राज्यातील इतर सचिवांना आदेश जारी केला की, त्यांच्या विभागातील कोणतीही फाईल नष्ट किंवा गहाळ होता कामा नये.
पश्चिम बंगालचे मुख्य सचिव दुष्यंत नरियाला यांनी एक आदेश जारी करून सर्व विभागीय सचिवांना आदेश दिले आहेत की, कोणतेही महत्त्वाचे कागदपत्रे किंवा फाईल्स कार्यालयातून बाहेर घेऊन जाता येणार नाहीत. त्या कागदपत्रांना किंवा त्या फाईलींचे नुकसान होणार नाही किंवा त्या काढल्या जाणार नाहीत याची खात्री करावी. कोणत्याही फाईल्स किंवा कागदपत्रांची बेकायदेशीरपणे फोटोकॉपी किंवा स्कॅन करू नये. सर्व फाईल्स, कागदपत्रे आणि संबंधित पत्रव्यवहार योग्यरित्या जतन केला जावा. सर्व विभागप्रमुख आणि विभागीय सचिवांनी या कामावर वैयक्तिकरित्या देखरेख ठेवावी आणि पत्रातील सूचनांचे अत्यंत काळजीपूर्वक पालन करावे. याबाबतीत हलगर्जीपणा केल्यास वैयक्तिक जबाबदारी निश्चित केली जाणार आहे." असे त्यांनी आदेशात म्हटले आहे.
मुख्य सचिवांनी काढलेल्या या आदेशावरून स्पष्ट होते की, भाजपच्या हाती सत्ता येताच तृणमूल काँग्रेसविरोधात अनेक पाऊले उचलली जाण्याची शक्यता आहे. यामुळे, सर्व विभागांच्या सचिवांवर आधीच दबाव टाकण्यात आला आहे, की कोणताही कागद किंवा फाईल नष्ट झाल्यास किंवा गहाळ झाल्यास त्यांना अधिकृतपणे जबाबदार धरले जाईल. निवडणुकीदरम्यान, पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह सर्व भाजप नेत्यांनी स्पष्ट केले होते की, भाजप सरकार स्थापन झाल्यानंतर तृणमूल काँग्रेसच्या सर्व घोटाळ्यांची चौकशी करेल. मुख्य सचिवांनी काढलेला हा आदेश यासंदर्भातील एक मोठे पाऊल आहे. राज्यात सरकार बदलल्यानंतर कागदपत्रे एकतर नष्ट केली जातात किंवा गायब केली जातात. असे होण्यापासून रोखण्यासाठी हा आदेश जारी करण्यात असल्याचेही म्हटले जात आहे.

