Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
भाजप परिवार धर्मेंद्र प्रधानांच्या पाठीशी: म्हणाले CM फडणवीस

भाजप परिवार धर्मेंद्र प्रधानांच्या पाठीशी: म्हणाले CM फडणवीस

मुंबई-केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. 'धर्मेंद्र प्रधानांनी व्यापक जनहिताप्रती वचनबद्धता दर्शवत राजीनामा दिला.

संपूर्ण भाजप परिवार त्यांच्या पाठीशी उभा आहे,' असे ते म्हणाले.

नीट पेपरफुटी प्रकरणी धमेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी 'कॉकरोच जनता पार्टी' गेल्या ३६ दिवसांपासून जंतर मंतरवर आंदोलन करत होते. आज दुपारी धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या शिक्षणमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. प्रधान यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत आपल्या राजीनाम्याची माहिती दिली. यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये धर्मेंद्र प्रधान यांचे निर्णयाचे कौतुक केले. तसेच प्रधान यांच्या कार्यकाळातील विविध महत्त्वाच्या कामगिरीचा आवर्जून उल्लेख केला. ते म्हणाले, 'धर्मेंद्र प्रधान यांनी देशाच्या शिक्षण क्षेत्रात अनेक महत्त्वपूर्ण सुधारणा घडवून आणण्यात मोलाची भूमिका बजावली. राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या अंमलबजावणीत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. पीएम श्री शाळांची स्थापना, परदेशात आयआयटींचा विस्तार आणि प्रवेश परीक्षांचा १९ भाषांपर्यंत विस्तार यांसारख्या अनेक सुधारणांचे त्यांनी नेतृत्व केले.
भाजप धर्मेंद्र प्रधानांच्या पाठिशी

धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर भाजप परिवार खंबीरपणे त्यांच्या पाठीशी असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, 'व्यापक जनहिताप्रती आपली वचनबद्धता दर्शवत, त्यांनी आज आपला राजीनामा सादर केला. त्यांनी वैयक्तिक स्वार्थापेक्षा राष्ट्रीय हिताला प्राधान्य दिले, जे एका खऱ्या भाजप कार्यकर्त्याचे वैशिष्ट्य आहे. संपूर्ण भाजप परिवार त्यांच्या पाठीशी उभा आहे.'
प्रधानांच्या राजीनाम्यानंतर फडणवीस दिल्लीत

दरम्यान, धर्मेंद्र प्रधान यांनी पद सोडताच देवेंद्र फडणवीस आज तातडीने दिल्लीला गेले होते. मुख्यमंत्र्यांच्या या दिल्ली दौऱ्यावर बोलताना 'फडणवीस केंद्रात शिक्षणमंत्री होऊ शकतात' असा दावा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला. यामुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे. फडणवीस यांनी आज दिल्लील भाजपच्या जेष्ठ नेत्यांची भेट घेतली. या भेटीनंतर ते सायंकाळी पुन्हा महाराष्ट्रात परतले आहेत. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत कोणत्या नेत्यांची भेट घेतली आणि त्या भेटीत काय चर्चा झाली? याबाबतची माहिती समजू शकली नाही.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: My Marathi