Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
'डॉक्टरांनी कृत्रिम बुद्धिमत्तेचा नैतिकतेने वापर करावा'-विश्वराज हॉस्पिटलच्या संचालिका डॉ. अदिती कराड

'डॉक्टरांनी कृत्रिम बुद्धिमत्तेचा नैतिकतेने वापर करावा'-विश्वराज हॉस्पिटलच्या संचालिका डॉ. अदिती कराड

विश्वराज हॉस्पिटलमध्ये केक कापून डॉक्टर्स डे साजरा

पुणे/लोणी काळभोर, २ जुलै: 'अत्याधुनिक युगात डॉक्टरांनी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करावा. एआय हा डॉक्टरांचा पर्याय नसून एक सक्षम सहाय्यक आहे.

यामुळे निदानाची अचूकता वाढते, वेळेची बचत होते आणि प्रशासकीय कामांचा भार कमी होतो. त्यामुळे रुग्णांवर अधिक चांगल्या प्रकारे लक्ष केंद्रित करणे शक्य होते,' असे विचार विश्वराज हॉस्पिटलच्या संचालिका डॉ. अदिती राहुल कराड यांनी व्यक्त केले.

राष्ट्रीय डॉक्टर्स दिनानिमित्त लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटलतर्फे केक कापून डॉक्टरांच्या योगदानाचा गौरव करण्यात आला. डॉक्टरांचे समर्पण आणि सेवा यांचे स्मरण करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या प्रसंगी विश्वराज हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. सुजीथ कुमार, डॉ. विजय खंडाळे, डॉ. सुषमा आणि सहाय्यक वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन कातकाडे उपस्थित होते. तसेच विश्वराज हॉस्पिटलचे सर्व सल्लागार डॉक्टर, विभाग प्रमुख व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आरोग्यदूतांच्या करुणा, जिद्द आणि माणुसकीला वाहिलेली आदरांजली म्हणजे 'बिहाईंड द मास्क: हू हील्स द हीलर्स' म्हणजेच 'मुखवट्यांच्या मागे: आरोग्यदूतांवर उपचार कोण करतो' या डॉक्टर्स डे च्या संकल्पनेच्या फलकाचे अनावरण डॉ. अदिती कराड यांच्या हस्ते करण्यात आले.

डॉ. अदिती कराड म्हणाल्या, 'सेवाभाव अत्यंत महत्त्वाचा असून त्यातूनच समाजात उत्तम प्रतिमा निर्माण होते. 'रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा' या ब्रीदवाक्यानुसार रुग्णांची सेवा करावी. डॉक्टरांचे कष्ट, करुणा आणि समर्पण हे आरोग्यसेवा प्रणालीचा कणा आहे. अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीतही त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे असंख्य लोकांचा विश्वास आणि कृतज्ञता डॉक्टरांनी मिळवली आहे. तंत्रज्ञानाची कास धरून ऑनलाइन माध्यमे व एआयचा वापर मोठ्या प्रमाणात करण्याचे आवाहन डॉक्टरांना केले,'

डॉ. सुजीथ कुमार, डॉ. सुषमा, डॉ. सचिन कातकाडे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, 'डॉक्टरकी हा केवळ व्यवसाय नसून ती रुग्णसेवा आहे. डॉक्टर सतत नाजूक आणि भावनिक क्षणांमध्ये गुंतलेले असल्याने टीमवर्क खूप महत्त्वाचे आहे. वैद्यकीय सेवेला व्रत समजून कार्य केल्यास समाज सुदृढ होण्यास वेळ लागणार नाही.'

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. हिना पठाण आणि डॉ. यश वाघमारे यांनी केले. डॉ. शर्वरी उभरे यांनी आभार मानले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: My Marathi