Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
राष्ट्रवादी काँग्रेसकडून झिशान सिद्दिकींचे पुनर्वसन:विधान परिषदेची उमेदवारी

राष्ट्रवादी काँग्रेसकडून झिशान सिद्दिकींचे पुनर्वसन:विधान परिषदेची उमेदवारी

मुंबई-विधान परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आलेल्या एकमेव जागेचा पेच अखेर सुटला आहे. पक्षाचे तरुण नेते आणि माजी आमदार झिशान सिद्दिकी यांना उमेदवारी देण्याचा निर्णय पक्षश्रेष्ठींकडून घेण्यात आला आहे.

काल रात्री उशिरापर्यंत चाललेली कोअर कमिटीची बैठक आणि त्यानंतर झालेली वरिष्ठ नेत्यांची चर्चा यानंतर झिशान सिद्दिकींच्या नावावर अधिकृत मोहोर उमटवण्यात आली आहे.झिशान सिद्दिकी हे वांद्रे पूर्व मतदारसंघाचे माजी आमदार आहेत. विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता, मात्र त्यानंतरही ते पक्षात सक्रिय राहिले. पक्षातील तरुण आणि अल्पसंख्याक चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. आता विधान परिषदेच्या माध्यमातून त्यांचे राजकीय पुनर्वसन करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीने केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर काँग्रेसची साथ सोडून अजित पवारांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवणारे बाबा सिद्दिकी हे पहिले बडे नेते होते. त्यांच्या निधनानंतर सिद्दिकी कुटुंबाची राजकीय वारसदारी झिशान सिद्दिकी समर्थपणे सांभाळत आहेत. विधानसभा निवडणुकीपूर्वी झिशान यांनीही राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. त्यांच्या याच निष्ठेचा विचार करून पक्षाने त्यांना विधान परिषदेवर पाठवण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर झिशान सिद्दिकी म्हणाले, आजचा दिवस माझ्यासाठी महत्त्वाचा आहे. मी वहिनी साहेब, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, पार्थ पवार यांचे आभार मानतो. त्यांनी मला एक संधी दिली. अजितदादांचा जो वादा होता, तो त्यांनी पूर्ण केला. माझ्यासारख्या युवा नेतृत्त्वाला त्यांनी विधान परिषदेत पाठवले. देशातील युवा वर्गाला राष्ट्रवादी पक्षाशी जोडण्यासाठी मी पूर्णपणे प्रयत्न करेल. अल्पसंख्याकांसाठी आवाज उठवेल. वहिनी साहेबांच्या नेतृत्त्वा महिला सक्षमीकरणासाठी काम करू. आपले दु:ख बाजुला ठेवून आपल्याला लोकांसाठी काम करायचे आहे, असे वहिनीसाहेबांनी मला सांगितले आहे.
काल रात्री 'देवगिरी' निवासस्थानी नेत्यांमध्ये फोनवरून आणि प्रत्यक्ष प्रदीर्घ चर्चा झाली. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतली होती. महायुतीमधील मित्रपक्षांशी चर्चा केल्यानंतर झिशान सिद्दिकींचे नाव शर्यतीत आघाडीवर आले. पक्षातील काही वरिष्ठ नेत्यांची इतर नावांसाठी आग्रही भूमिका होती, मात्र सिद्दिकी यांच्या नावावर अखेर सर्वांचे एकमत झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार, 23 एप्रिल 2026 पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. आज 30 एप्रिल 2026 ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. 2 मे 2026 रोजी अर्जांची छानणी करण्यात येणार असून, 4 मे 2026 हा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. या निवडणुकीसाठी 12 मे 2026 रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत मतदान होणार असून त्याच दिवशी सायंकाळी 5 वाजता मतमोजणी होणार आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: My Marathi