Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा

विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा

पुणे (प्रतिनिधी) : आषाढी वारीनिमित्त पंढरीच्या लाखो वारकऱ्यांना कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ आरोग्यसेवा उपलब्ध व्हावी, यासाठी महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा ( डायल १०८) अंतर्गत २७ रुग्णवाहिका २४ तास सेवेत तैनात करण्यात आल्या होत्या.

या सेवेमार्फत एकूण २,४४५ वारकऱ्यांना वेळेत वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्यात आली. राज्यात महाराष्ट्र्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा बीव्हीजीद्वारे संचालित केली जाते.

वारकऱ्यांना तात्काळ आरोग्यसेवा उपलब्ध व्हावी, यासाठी पंढरपूर येथे विशेष नियंत्रण कक्ष उभारण्यात आला होता. या नियंत्रण कक्षातून पालखी सोहळ्याचे सातत्याने निरीक्षण करून आवश्यकतेनुसार तात्काळ रुग्णवाहिका पाठविण्याचे नियोजन करण्यात आले. या नियंत्रण कक्षाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट देऊन सेवा व्यवस्थेची पाहणी केली.

याबाबत प्रतिक्रिया देताना बीव्हीजीचे चेअरमन हणमंतराव गायकवाड म्हणाले, 'पंढरीच्या वारीत भाविकांची सेवा करण्याची संधी मिळणे हे आमचे भाग्य आहे. आरोग्यमंत्री डॉ. प्रकाश अबिटकर यांच्या सूचनेनुसार आम्ही अल्पावधीत २७ रुग्णवाहिकांचे नियोजन केले. वारकऱ्यांना सुरक्षित व आरोग्यमय वारीचा अनुभव मिळावा, यासाठी बीव्हीजीचे आरोग्यदूत अहोरात्र सेवेत कार्यरत होते.'

मानाच्या दहा पालख्यांसाठी १०८ रुग्णवाहिका सेवा उपलब्ध करून देण्यात आली. या पालख्यांमध्ये संत निवृत्तीनाथ महाराज (त्र्यंबकेश्वर), संत ज्ञानेश्वर महाराज (आळंदी), संत सोपानकाका महाराज (सासवड), संत मुक्ताबाई (मुक्ताईनगर), संत तुकाराम महाराज (देहू), संत नामदेव महाराज (पंढरपूर), संत एकनाथ महाराज (पैठण), रुक्मिणी माता (कौडानेपूर, अमरावती), संत निळोबाराय (पिंपळनेर, पारनेर) आणि संत चांगाटेश्वर महाराज (सासवड) यांचा समावेश होता.

आषाढी वारीदरम्यान 'गुड समरीटन' स्वयंसेवकांनी ॲपचा प्रभावी वापर करून आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ माहिती १०८ नियंत्रण कक्षापर्यंत पोहोचवली. त्यामुळे रुग्णांना वेळेत वैद्यकीय मदत मिळण्यास मोठी मदत झाली.

याबाबत स्वयंसेवक दयानंद मेंशेके म्हणाले, 'आषाढी वारीपूर्वी शासनामार्फत आयोजित प्रशिक्षणामुळे आपत्कालीन परिस्थितीत मदत करण्याचा आत्मविश्वास मिळाला. एक महिला भाविक बेशुद्ध पडताच मी तात्काळ 'गुड समरीटन' ॲपद्वारे माहिती दिली. ॲप प्रभावीपणे कार्यरत असल्याने १०८ रुग्णवाहिका अल्पावधीत घटनास्थळी पोहोचली आणि संबंधित महिलेला वेळेत वैद्यकीय उपचार मिळू शकले.'

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: My Marathi