मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा जोर अद्याप कायम असून, पुढील 24 तास अत्यंत महत्त्वाचे असल्याचा इशारा भारतीय हवामान विभागाने (IMD) दिला आहे. मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी जोरदार ते अतिमुसळधार पावसाची नोंद झाली असून, कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रभाव अद्याप कायम असल्याने पावसाचा जोर पुढील काही तास कायम राहण्याची शक्यता आहे.
घाटमाथ्यावर रेड अलर्ट-
हवामान विभागाचे शास्त्रज्ञ एस. डी. सानप यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे आणि सातारा जिल्ह्यातील घाटमाथा परिसरासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर पुणे शहरासाठी यलो अलर्ट देण्यात आला असून नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, रविवारनंतर पावसाची तीव्रता हळूहळू कमी होण्याची शक्यता आहे.
दरडी कोसळण्याचा धोका-
सततच्या पावसामुळे घाटमाथा भागात दरडी कोसळण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा, घाट रस्त्यांवरून प्रवास करताना विशेष दक्षता घ्यावी आणि स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
धुळे जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा-
धुळे जिल्ह्यात मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक सखल भाग जलमय झाले आहेत. हवामान विभागाने अतिवृष्टीचा इशारा दिल्यानंतर जिल्हा प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून प्राथमिक व माध्यमिक शाळांना स्थानिक परिस्थितीनुसार सुट्टी जाहीर करण्याचे निर्देश दिले आहेत.
धरणांमधून पाण्याचा विसर्ग-
सततच्या पावसामुळे शिरपूर तालुक्यातील अनेर धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाली असून धरणातून सुमारे 4,921 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. तसेच अक्कलपाडा धरणातूनही पाणी सोडण्यात येत असल्याने नदीकाठच्या गावांतील नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
नागरिकांना प्रशासनाचे आवाहन-
पूरग्रस्त किंवा नदी-नाल्यांच्या परिसरात जाणे टाळावे, लहान मुलांवर विशेष लक्ष ठेवावे आणि कोणतीही अफवा न पसरवता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. तसेच अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असेही नागरिकांना सांगण्यात आले आहे.
राज्यातील अनेक भागांमध्ये पुढील 24 तास पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवली असून नागरिकांनीही सतर्क राहून सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
ई-20 विरोध में युवक कांग्रेस का प्रदर्शन #nagpurnews #e20 #ethenol #nitingadkari #maharashtranews
लगातार बारिश से कपास पर रस चूसने वाले कीटों का प्रकोप #maharashtranews...
पेपर लीक के खिलाफ संभाजी ब्रिगेड का जोरदार प्रदर्शन #maharashtranews #nanded #newsupdate...
भातसा बांध के पांच गेट 100 सेंटीमीटर तक खोले गए #maharashtranews #shahpur...
नागपुर में दर्दनाक घटना; घर से दुर्गंध आने पर खुला राज.. #Nagpur...
भुजबल को पालकमंत्री बनाओ: एनसीपी युवा कांग्रेस की मांग #maharashtranews #nashik #newsupdate...

