Dailyhunt
Aaple Sarkar Portal: 'आपले सरकार' पोर्टल ६ दिवसांपासून ठप्प! नागरिक त्रस्त, हजारो कामे अडकली

Aaple Sarkar Portal: 'आपले सरकार' पोर्टल ६ दिवसांपासून ठप्प! नागरिक त्रस्त, हजारो कामे अडकली

  • ‘आपले सरकार’ पोर्टल गेल्या ६ दिवसांपासून बंद असल्याने अर्ज भरणे आणि कागदपत्रे अपलोड करण्याची प्रक्रिया पूर्णपणे ठप्प झाली आहे.
  • सर्व्हरमधील तांत्रिक बिघाडामुळे डेटा बॅकअप आणि सुरक्षा पडताळणीचे काम सुरू असून सेवा पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
  • पोर्टल बंद असल्यामुळे तहसील स्तरावर अर्ज पडताळणी, मंजुरी आणि डिजिटल स्वाक्षरीची प्रक्रिया देखील थांबली आहे.
डिजिटल महाराष्ट्राच्या महत्त्वाच्या सेवांपैकी एक असलेले ‘आपले सरकार’ पोर्टल गेल्या ६ दिवसांपासून तांत्रिक बिघाडामुळे पूर्णपणे बंद पडले असून, राज्यातील नागरिक आणि सेवा केंद्रधारकांची मोठी गैरसोय होत आहे. पोर्टलचे मुख्य पान उघडत नसल्याने किंवा सतत ‘एरर’ येत असल्याने नवीन अर्ज भरणे, कागदपत्रे अपलोड करणे किंवा अर्जाची स्थिती तपासणे ही सर्व कामे पूर्णपणे ठप्प झाली आहेत. यामुळे राज्यातील हजारो ‘आपले सरकार’ सेवा केंद्र धारकांसह सामान्य नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत असून, डिजिटल सेवा यंत्रणा कोलमडल्याचे चित्र दिसत आहे.

Census 2027: सावधान! जनगणनेच्या नावाखाली तुमचीही होऊ शकते फसवणूक… चुकूनही शेअर करू नका ही माहिती

डेटा बॅकअप सोबतच सुरक्षिततेची पडताळणी

या गंभीर तांत्रिक बिघाडाबाबत महाआयटीच्या तांत्रिक पथकातील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की सर्व्हरच्या डेटाबेसमध्ये तांत्रिक गुंतागुंत निर्माण झाली असून, यंत्रणा पूर्ववत करण्यासाठी डेटा बॅकअप आणि सुरक्षिततेची पडताळणी सुरू आहे. नागरिक आणि केंद्रधारकांचा डेटा सुरक्षित असून, तांत्रिक अडवण दूर करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. प्रशासकीय स्तरावरही या खोळंब्याचा परिणाम जाणवत आहे. (फोटो सौजन्य - Pinterest)

याबाबत काय म्हणत आहेत प्रशासकीय अधिकारी?

बोरिवलीचे नायब तहसीलदार श्रीनिवास जांभळे यांनी सांगितले की, पोर्टल ओपन होत नसल्याने तहसील कार्यालयातील लॉगिनलाही अर्ज प्राप्त होत नाहीत, परिणामी पडताळणी आणि मंजुरीची प्रक्रिया थांबली आहे. तर कुर्ल्याचे नायब तहसीलदार राकेश दाभाडे यांनी स्पष्ट केले की, सर्वर डाऊन असल्याने डिजिटल स्वाक्षरीची कामे प्रलंबित आहेत. यंत्रणा पुन्हा सक्रिय होताच प्रलंबित अर्जाचे निकाल तातडीने लावून नागरिकांना दाखले वितरित करण्यास आमचे प्राधान्य राहील. नागरिकांनी तोपर्यंत प्रशासनाला सहकार्य करावे.

Census 2027: लॉगिनपासून घराच्या लोकेशनपर्यंत… ऑनलाईन असा भरा जनगणना फॉर्म, स्टेप-बाय-स्टेप वाचा संपूर्ण प्रोसेस

तांत्रिक बाबींकडे तातडीने लक्ष द्यावे !

या परिस्थितीवर ‘महाराष्ट्र व्हीएलई संवाद’चे सदस्य शहाजी सावंत यांनी चिंता व्यक्त केली आहे. ते म्हणाले, पोर्टल लॉगिनच होत नसल्याने आम्ही हतबल झालो आहोत. नागरिक लांबून केंद्रावर येतात, मात्र तांत्रिक समस्येमुळे आम्हाला त्यांना रिकाम्या हाती परत पाठवावे लागते. गेल्या ७२ तासांपासून काम बंद असल्याने केंद्रचालकांचे आर्थिक नुकसान होत आहे आणि ग्राहकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. शासनाने या तांत्रिक बाबींकडे तातडीने लक्ष देणे गरजेचे आहे. दाखल्याअभावी विद्याथ्यांचे शैक्षणिक प्रवेश आणि नागरिकांची महत्त्वाची शासकीय कामे रखडल्याने सर्वसामान्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra