- आज बसवेश्वर जयंती आहे
- बसवेश्वरांचा इतिहास, शिकवण आणि जीवनकथा
- संत, समाजसुधारक आणि लिंगायत संप्रदायाचे संस्थापक
संत, समाजसुधारक आणि लिंगायत संप्रदायाचे संस्थापक
महात्मा बसवेश्वर महाराज हे कर्नाटकातील संत, समाजसुधारक होते.
त्यांनी हिंदू धर्मातील जातिव्यवस्थेविरुद्ध आणि अन्य हानिकारक प्रथांविरुद्ध संघर्ष केला. त्यांनी निर्गुण, निराकार एकेश्वरवादी श्रद्धेचा पुरस्कार केला. महात्मा बसवेश्वर (बसवण्णा) हे १२ व्या शतकातील एक महान क्रांतिकारक समाजसुधारक, तत्त्वज्ञ आणि लिंगायत (वीरशैव) संप्रदायाचे संस्थापक होते. त्यांना “हिंदू धर्मातील आद्य समाजसुधारक” म्हणून ओळखले जाते कारण त्यांनी त्याकाळी हिंदू धर्मात शिरलेल्या कर्मठ प्रथा आणि विषमतेविरुद्ध आवाज उठवला.
जातिव्यवस्था व अंधश्रद्धेविरुद्ध बसवेश्वरांचा लढा
भारतीय समाजजीवनात जयंती साजरी करणे ही केवळ परंपरा नसून ती आत्मपरीक्षणाची आणि प्रेरणा घेण्याची संधी असते. असे एक महान क्रांतिकारी समाजसुधारक म्हणजे महात्मा बसवेश्वर त्यांची आज जयंती. ही केवळ एका संताची आठवण नसून, ती समता, बंधुता आणि सामाजिक न्यायाच्या विचारांना पुनश्च: जागवण्याची वेळ आहे.
१२व्या शतकातील कर्नाटकात बसवेश्वरांनी ज्या विचारांची मशाल पेटवली, ती त्या काळातील कठोर जातिव्यवस्था, अंधश्रद्धा आणि कर्मकांडांविरुद्धची थेट बंडखोरी होती. त्यांनी धर्माला केवळ कर्मकांडांमध्ये अडकवून ठेवण्यास विरोध केला आणि 'मानवधर्म' हीच खरी साधना असल्याचे प्रतिपादन केले. त्यांच्या विचारांचा केंद्रबिंदू होता. प्रत्येक माणूस समान आहे आणि कोणत्याही प्रकारच्या भेदभावाला स्थान नाही.
'लिंगायत' चळवळ: सामाजिक क्रांतीची सुरुवात
या विचारांवर आधारलेली 'लिंगायत' चळवळ ही भारतीय समाजातील एक मोठी परिवर्तनाची लाट ठरली. ‘लिंगायत समाजाची’ निर्मिती ही केवळ धार्मिक नव्हती, तर ती सामाजिक क्रांतीची पायाभरणी होती. लिंगायत समाजाने जातिभेदाला स्पष्टपणे नाकारले आणि 'इष्टलिंग' धारण करून प्रत्येक व्यक्तीला ईश्वराशी थेट नाते जोडण्याचा अधिकार दिला. यामुळे मध्यस्थांची गरज संपुष्टात आली आणि धर्म अधिक लोकाभिमुख झाला.
'कायाक' आणि 'दासोह' तत्त्वांनी समतेचा पाया
बसवेश्वरांनी 'कायाक' आणि 'दासोह' या तत्त्वांद्वारे समाजाला नवी दिशा दिली. 'कायाक' म्हणजे श्रमाची प्रतिष्ठा! कोणतेही काम कमी नाही, प्रत्येक श्रम पूजनीय आहे. 'दासोह' म्हणजे समाजासाठी समर्पण. आपल्या उत्पन्नातील काही भाग इतरांच्या कल्याणासाठी अर्पण करणे. या दोन तत्त्वांनी आर्थिक आणि सामाजिक समतेचा मजबूत पाया घातला.
लिंगायत चळवळीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे स्त्री-पुरुष समानतेचा पुरस्कार. त्या काळात स्त्रियांना दुय्यम स्थान दिले जात असताना, बसवेश्वरांनी त्यांना समाजजीवनात समान स्थान दिले. अक्कमहादेवीसारख्या स्त्री संतांनी या चळवळीत सक्रिय सहभाग घेतला, ही त्या काळातील एक क्रांतिकारी घटना होती.
अनुभव मंटप: लोकशाही विचारमंचाची स्थापना
बसवेश्वरांनी स्थापन केलेले 'अनुभव मंटप' हे जगातील पहिले लोकशाही विचारमंच मानले जाते. येथे सर्व जाती, धर्म आणि लिंगभेद विसरून लोक एकत्र येत आणि आपल्या अनुभवांवर आधारित विचार मांडत. ही संस्था म्हणजे विचारस्वातंत्र्य, संवाद आणि समतेचा जिवंत नमुना होती.
समाजपरिवर्तनासाठी बसवेश्वरांचे विचार महत्त्वाचे
आजच्या काळात, जरी समाजाने मोठी प्रगती केली असली, तरी अजूनही भेदभाव, विषमता आणि अंधश्रद्धा पूर्णपणे नष्ट झालेल्या नाहीत. अशा परिस्थितीत बसवेश्वरांच्या विचारांची प्रासंगिकता अधिकच वाढते. लिंगायत समाजाने आजही त्यांच्या तत्त्वांचा वारसा जपला आहे, मात्र या विचारांचा व्यापक समाजात प्रसार होणे आवश्यक आहे.
दरम्यान, एक गोष्ट स्पष्टपणे मान्य करावी लागेल की, आपण बसवेश्वरांना केवळ जयंतीपुरते मर्यादित ठेवले आहे. त्यांच्या विचारांचा खरा स्वीकार हा केवळ उत्सव साजरा करण्यात नसून, तो आपल्या आचरणात दिसला पाहिजे. जातिभेद, अंधश्रद्धा आणि अन्याय याविरुद्ध उभे राहणे हीच बसवेश्वरांना खरी आदरांजली ठरेल.
महात्मा बसवेश्वरांची जयंती ही केवळ स्मरणाचा दिवस नसून, ती समाजपरिवर्तनाची शपथ घेण्याची संधी आहे. त्यांच्या समतेच्या, श्रमसंस्कृतीच्या आणि मानवतेच्या विचारांचा स्वीकार केल्यासच आपण एक सुसंस्कृत, न्याय्य आणि प्रगत समाज घडवू शकतो.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

