शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील घडामोडी आणि आगामी राजकीय समीकरणांवर भाष्य करत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मोठे विधान केले आहे. “एक दिवस उद्धव ठाकरेंना आमच्याकडे यावंच लागेल,” असा दावा करत त्यांनी २०१९ मध्ये महायुतीसोबत न येण्याचा निर्णय ही त्यांची चूक असल्याचे म्हटले.
सांगली येथे पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केले.
‘२०१९ मध्ये आमच्यासोबत आले असते तर…’
रामदास आठवले म्हणाले, “हे टायगर ऑपरेशन नाही, ऑपरेशन देवेंद्र फडणवीस नाही, हे तर उद्धव ठाकरेंचं ऑपरेशन झालं आहे. आज आमदार-खासदार आमच्याकडे येत आहेत. २०१९ मध्येच आम्ही उद्धव ठाकरेंना आमच्यासोबत येण्याचा सल्ला दिला होता. पण त्यांनी तो स्वीकारला नाही. ती त्यांची चूक होती आणि त्यामुळेच आज त्यांच्यावर ही वेळ आली आहे.”
आदित्य ठाकरेंवरही निशाणा
आदित्य ठाकरे यांनी महायुती सरकारचे हे शेवटचे अधिवेशन असल्याचा दावा केला होता. त्यावर प्रत्युत्तर देताना आठवले म्हणाले, “सरकारचं नव्हे, तर आदित्य ठाकरे यांचंच हे शेवटचं अधिवेशन आहे. ही त्यांची शेवटची आमदारकी असेल.”
यावेळी त्यांनी वरळी मतदारसंघाचाही उल्लेख करत, “वरळीत त्यांना निवडून आणण्यात आमचाही वाटा होता,” असा दावा केला.
‘रामरक्षा आंदोलनाऐवजी शिवसेना रक्षा आंदोलन करा’
अयोध्येतील राम मंदिरातील चोरीच्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्धव ठाकरे यांनी राज्यभर ‘रामरक्षा महाआरती’ आंदोलनाची घोषणा केली आहे. यावर टीका करत रामदास आठवले म्हणाले, “रामरक्षा महाआरती करण्यापेक्षा उद्धव ठाकरे यांनी ‘शिवसेना रक्षा आंदोलन’ करायला हवं.”
पुढे त्यांनी खोचक सल्ला देत म्हटले, “उद्धव ठाकरे यांनी अयोध्येला जाऊन प्रभू श्रीरामाकडे आपल्या पक्षातील एकही आमदार फुटू नये, अशी प्रार्थना करावी.”
दरम्यान, रामदास आठवले यांच्या या विधानांमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चा रंगली असून त्यांच्या वक्तव्यावर शिवसेना ठाकरे पक्षाकडून काय प्रतिक्रिया येते, याकडे लक्ष लागले आहे.

