Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
हिंजवडी पुन्हा तुंबली तर अधिकाऱ्यांना जबाबदार धरणार; PMRDA आयुक्तांचा कारवाईचा इशारा

हिंजवडी पुन्हा तुंबली तर अधिकाऱ्यांना जबाबदार धरणार; PMRDA आयुक्तांचा कारवाईचा इशारा

पिंपरी: पावसाळ्यात हिंजवडी आयटी पार्क आणि परिसरात पाणी साचून आयटीयन्ससह स्थानिक नागरिकांचे हाल झाल्यास, आता थेट संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना जबाबदार धरले जाणार आहे. नियोजनाअभावी पाणी साचल्यास किंवा कोणतीही दुर्घटना घडल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर ‘आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत’ कठोर कारवाई करण्याचा स्पष्ट इशारा पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिला आहे.

आकुर्डी येथील पीएमआरडीए मुख्यालयात बुधवारी ( दि. २९) रोजी आयोजित पावसाळापूर्व आपत्ती व्यवस्थापन आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी त्यांनी सर्व संबंधित यंत्रणांना ३१ मे २०२६ पूर्वी नालेसफाईची कामे पूर्ण करण्याचे बंधनकारक केले आहे.

‘डेडलाईन’ ३१ मे; कामात तडजोड नको

हिंजवडी आणि माण आयटी पार्क परिसरात दरवर्षी पावसाळ्यात पाणी साचल्याने किलोमीटरपर्यंत वाहतूक कोंडी होते. हा प्रश्न सोडवण्यासाठी केवळ बैठकांचे गुऱ्हाळ नको, तर प्रत्यक्ष जमिनीवर अंमलबजावणी हवी, असे खडेबोल आयुक्तांनी सुनावले. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI), एमआयडीसी, पीएमआरडीए, ग्रामपंचायती आणि पाटबंधारे विभाग यांनी एकमेकांवर जबाबदारी न ढकलण्याबाबत त्यांनी बजावले आहे.

बैठकीतील मुख्य निर्देश

नाले खोलीकरण व रुंदीकरण : हिंजवडी-माण परिसरातील मुख्य नाले तातडीने मोकळे करून त्यांचे खोलीकरण करावे.

अतिक्रमणे हटवणार – नाल्यांच्या नैसर्गिक प्रवाहात अडथळा ठरणारी सर्व अतिक्रमणे ३१ मेपूर्वी हटवण्याचे आदेश.

ब्लॅक स्पॉट्सवर लक्ष : पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलिसांनी सुचवलेल्या उपाययोजनांनुसार पाणी साचणाऱ्या ‘ब्लॅक स्पॉट्स’वर विशेष काम केले जाणार आहे.

समन्वय समिती : एमआयडीसी, पीएमआरडीए आणि एनएचएआयने समन्वयाने पाण्याचा निचरा होईल याची खबरदारी घ्यावी.

“पावसाळापूर्व कामांमध्ये कोणतीही हलगर्जी खपवून घेतली जाणार नाही. ३१ मे पर्यंत कामे पूर्ण न झाल्यास किंवा नियोजनाअभावी जीवित वा वित्तहानी झाल्यास, जबाबदार अधिकाऱ्यावर फौजदारी कारवाई निश्चित केली जाईल.”

- डॉ. अभिजीत चौधरी, महानगर आयुक्त, पीएमआरडीए

‘अनक्लॉग हिंजवडी’चा पाठपुरावा

हिंजवडीतील पाणी साचण्याच्या समस्येबाबत ‘अनक्लॉग हिंजवडी’च्या वतीने सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. या बैठकीला ‘अनक्लॉग हिंजवडी’चे सचिन लोंढे यांच्यासह पीएमआरडीएच्या अतिरिक्त आयुक्त के. मंजुलक्ष्मी, पोलीस उपायुक्त (वाहतूक) विवेक पाटील, एमआयडीसीचे मुख्य अभियंता कालिदास भांडेकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल सोनवणे आणि विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

हे सुद्धा वाचा : ठरलं तर! विधान परिषद निवडणूक होणार बिनविरोध, 9 जागांसाठी कोणत्या पक्षाकडून कोणाला उमेदवारी?

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra