Dailyhunt
निष्काळजीपणाचा कहर! हॉटेलमध्ये पोलीस झोपले, चकमा देत महाराष्ट्रातून रिमांडवर असलेला आरोपी हरिद्वारमधून फरार

निष्काळजीपणाचा कहर! हॉटेलमध्ये पोलीस झोपले, चकमा देत महाराष्ट्रातून रिमांडवर असलेला आरोपी हरिद्वारमधून फरार

  • हरिद्वारमध्ये हॉटेलमध्ये थांबलेल्या पोलिसांना आरोपीने चकमा दिला.
  • रात्री झोपेत असताना आरोपी हातकडीसह फरार झाला.
  • हरिद्वार पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू.
हरिद्वारमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे ज्याने सुरक्षा व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
एका किशोरवयीन मुलीचे अपहरण करणाऱ्या आरोपीला पोलीसांनीआपल्या ताब्यात घेतले होते. पण पुढे पोलिसांच्याच निष्काळजीपणामुळे आरोपीने शिताफीने अधिकाऱ्यांना चकमा देत हातकड्यांसह आपला पळ काढला. ही घटना हरिद्वारच्या हाॅटेलमध्ये घडली. चला नक्की काय घडलं ते जाणून घेऊया.

Ashok Kharat Case : अशोक खरातला आज पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार; आता 'या' गुन्ह्यात चांगलाच अडकणार

काय आहे प्रकरण?

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री महाराष्ट्रातील तळोजा पोलीस ठाण्याचे एपीआय प्रसाद डोंगर यांनी त्यांचे सहकारी पीएन एम खेडकर, महेश पाटील आणि उमेश पाटील यांच्यासह महाराष्ट्रातील मुंबई, खारवाला येथील रहिवासी आरोपी अमित ब्रह्मानंद याला पोलीस कोठडी रिमांडसाठी डेहराडूनला आणले होते. तपासानंतर ते हरिद्वारमधील हॉटेलमध्ये थांबले. रात्रीच्या प्रहरी जेव्हा सर्व अधिकारी झोपत गुंगले तेव्हाच आरोपीने संधीचा फायदा घेत हाॅटेलमधून गुपचूप पळ काढला.

बुधवारी सकाळी पोलिसांना जाग आल्यानंतर हा प्रकार लक्षात आला आणि एकच खळबळ उडाली. तत्काळ या घटनेची माहिती हरिद्वार पोलिसांना देण्यात आली. दरम्यान, हरिद्वार पोलिसांनी दिवसभर आरोपीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र अद्याप त्याचा काहीही मागमूस लागलेला नाही. महाराष्ट्र पोलिसांचे एपीआय प्रसाद डोंगर यांनी पोलिसांना सांगितले की, आरोपी अमितवर अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचा आरोप आहे. आरोपीला पीसीआरमधून डेहराडूनला आणण्यात आले होते. मात्र डेहराडूनमधून ट्रेन नसल्याने त्याला हरिद्वारला आणण्यात आले. इथून ते महाराष्ट्रासाठी रवाना होणार होते.

आईसोबत पैशांवरून वाद होताच मुलगा नैराश्येत; पाचव्या मजल्यावरून उडी मारून केली आत्महत्या

कोतवाली प्रभारी प्रवीण सिंह कोश्यारी यांनी सांगितले की, आरोपीचा शोध सुरू आहे. महाराष्ट्र पोलिसांनी अद्याप तक्रार दाखल केलेली नाही. तक्रार मिळाल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल. या प्रकरणात पुढील कारवाईसाठी महाराष्ट्र पोलिसांकडून तक्रार दाखल होण्याची प्रतीक्षा आहे. या संपूर्ण घटनेमुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटी पुन्हा एकदा समोर आल्या आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra