Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
पुण्यातील बुधवार पेठेत प्रेयसीची चाकूने निर्घृण हत्या; न्यायालयाने प्रियकराला सुनावली 'ही' मोठी शिक्षा

पुण्यातील बुधवार पेठेत प्रेयसीची चाकूने निर्घृण हत्या; न्यायालयाने प्रियकराला सुनावली 'ही' मोठी शिक्षा

पुणे : देहविक्रयाचा व्यवसाय करणाऱ्या प्रेयसीची चाकूने निर्घृण हत्या करणाऱ्या प्रियकराला पुणे न्यायालयाने जन्मठेप आणि ५० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. तरुणीला वाचविण्यासाठी आरोपीकडून चाकू हिसकावून घेताना जखमी झालेल्या पोलिस अंमलदारांसह प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांनी नोंदविलेली साक्ष खटल्यात महत्त्वाची ठरली आहे.

अतिरिक्त सत्र न्यायाधीश रजनी क्षीरसागर यांनी हा निकाल दिला आहे. बुधवार पेठेत ही घटना २३ मे २०१७ मध्ये रात्री घडली होती.

सुखदेव रामदास मडावी (वय ३४, रा. वडरवाडी, मूळ रा. यवतमाळ) याला न्यायालयाने दोषी ठरविले आहे. संबंध तोडल्याच्या वादातून त्याने २२ वर्षीय तरुणीचा खून केला होता. संबंधित तरुणी बुधवार पेठेत देहविक्रयाचा व्यवसाय करायची. आरोपीचे तिच्याशी प्रेमसंबंध होते. घटनेच्या दिवशी आरोपी सुखदेवचा तिच्याशी वाद झाला. रागाच्या भरात आरोपीने तरुणीच्या छातीवर आणि पोटात वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणीचा उपचारांपूर्वी मृत्यू झाला. गस्तीवरील पोलिस कर्मचाऱ्याने आरोपीला पकडले होते.

या खटल्यात अतिरिक्त सरकारी वकील नामदेव तरळगट्टी आणि अॅड. देवतरसे यांनी चौदा साक्षीदार तपासले. त्यामध्ये आरोपीला पकडणारे पोलिस अंमलदार, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांची साक्ष महत्त्वाची ठरली. बचाव पक्षाने आरोपीला खोट्या प्रकरणात अडकवल्याचा दावा केला होता; मात्र न्यायालयाने सरकारी पक्षाचा युक्तिवाद आणि पुरावे ग्राह्य धरत आरोपीला जन्मठेप ठोठावली आहे.

पोलिस अंमलदाराने दाखविले धाडस

ही घटना पाहून गस्तीवर असलेले फरासखाना ठाण्याचे तत्कालीन अंमलदार सुहास साळुंखे यांनी आरोपीला पकडण्याचा प्रयत्न केला. त्याच्याकडून चाकू हिसकावताना झालेल्या झटापटीत साळुंखे यांच्या बोटांना दुखापत झाली; तर पळून जाण्याच्या प्रयत्नात आरोपी पायऱ्यांवरून घसरून पडला. साळुंखे यांनी दुसऱ्या पोलिस अंमलदाराच्या मदतीने आरोपीला ताब्यात घेतले होते.

14 जणांच्या टोळक्याकडून तरुणाचा खून

र्वती पोलिस ठाण्याच्या हद्दीत जुन्या वादातून १४ जणांच्या टोळक्याने केलेल्या बेदम मारहाणीत एका मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. हा प्रकार सिंहगड रोड परिसरातील पानमळा येथे घडला आहे. याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे, तर पाच अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. शुभम राजू घोडके (वय २२) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्याचा मेहुणा विष्णू शिवाजी शिरसाठ (वय २२) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार अर्जुन कांबळे, अनिकेत कांबळे, गणेश कदम, मुंकुद राजगुरू आणि अंकुश काळे या पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. ही घटना १ ऑगस्ट रोजी रात्री नऊच्या सुमारास सिंहगड रस्त्यावरील वृंदावन नर्सरीजवळील पानमळा परिसरात घडली आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra