- देवेंद्र फडणवीस गुंडांची टोळी चालवत आहेत- संजय राऊत
- नरेंद्र मोदी आणि भाजपची लोकप्रियता घसरत असल्याचे हे स्पष्ट उदाहरण- संजय राऊत
- बांकीपूरचा निकालही भविष्यातील राजकारणावर परिणाम करू शकतो- संजय राऊत
बिहारमधील बांकीपूर पोटनिवडणुकीच्या निकालानंतर संजय राऊत यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. देशातील सध्याच्या राजकीय वातावरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपची लोकप्रियता घसरत असल्याचे हे स्पष्ट उदाहरण आहे, असा दावाही संजय राऊतांनी माध्यमांशी बोलताना केला.
राऊत म्हणाले की, १९९५ पासून भाजपचा बालेकिल्ला असलेली बांकीपूरची जागा पक्षाला टिकवता आली नाही. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी यापूर्वी मोठ्या मताधिक्याने जिंकलेली ही जागा गमावणे हा पक्षासाठी मोठा राजकीय धक्का असल्याचे त्यांनी म्हटले. पराभवामागे तीन प्रमुख कारणे दिसतात. राऊत म्हणाले की, जंतर-मंतरवरील ‘Gen Z’ आंदोलनावरील कारवाई, राम मंदिरातील कथित आर्थिक गैरव्यवहारावर सरकारची भूमिका आणि नितीन नवीन यांच्या यात्रेदरम्यान हनुमानाच्या वेशातील कलाकाराशी संबंधित वाद ही कारणे असल्याची दिसतात.
याशिवाय “तुम्ही राम मंदिर लुटत आहात, आंदोलन करणाऱ्या तरुणांवर गोळ्या झाडत आहात आणि धार्मिक प्रतीकांचा अवमान होत असल्याचा संदेश लोकांपर्यंत गेला. या सर्व गोष्टींचा परिणाम मतदारांच्या मानसिकतेवर होतो,” असे राऊत म्हणाले.
“विरोधकांचा आत्मविश्वास वाढेल”
आगामी विधानसभा निवडणुकांवर या निकालाचा परिणाम होईल का, असा प्रश्न विचारला असता राऊत म्हणाले की, अशा निकालांमुळे विरोधी पक्षांचा आत्मविश्वास वाढतो. अलाहाबाद पोटनिवडणुकीतील व्ही. पी. सिंग यांच्या विजयापासून काँग्रेसच्या घसरणीला सुरुवात झाली होती. तसेच गोरखपूर आणि फुलपूर पोटनिवडणुकांतील भाजपच्या पराभवानंतरही राजकीय समीकरणे बदलली होती. त्यामुळे बांकीपूरचा निकालही भविष्यातील राजकारणावर परिणाम करू शकतो, असही संजय राऊतांनी यावेळी सांगितलं
“६४ टक्के मतदारांनी भाजपविरोधात मतदान केले”
राऊत म्हणाले, “१९९५ पासूनचा गड भाजपला टिकवता आला नाही. याचा अर्थ ६४ टक्के मतदारांनी भाजपविरोधात मतदान केले आणि त्यांनी नवीन पर्याय स्वीकारला. राज्यात बदलाची हवा दिसत आहे.. “प्रशांत किशोर यांना यापूर्वी विधानसभा निवडणुकीत यश मिळाले नव्हते. मात्र, त्यांनी बांकीपूरमध्ये लक्ष केंद्रित करून प्रभावी प्रचार केला. भाजपने मतदारांना गृहीत धरले आणि त्याची किंमत त्यांना मोजावी लागली,” असे ते म्हणाले.

