Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
.तर सावर्जनिक जीवनातून निवृत्ती घेईन; दिलीप वळसे पाटील यांचे विरोधकांना खुले आव्हान

.तर सावर्जनिक जीवनातून निवृत्ती घेईन; दिलीप वळसे पाटील यांचे विरोधकांना खुले आव्हान

मेश जाधव/रांजणी : राज्यातील दूध भेसळ प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या राजकीय आरोप-प्रत्यारोपांना उत्तर देताना आंबेगावचे आमदार तथा माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी विरोधकांना थेट आव्हान दिले आहे.

“दूध भेसळ किंवा कोणत्याही बेकायदेशीर व्यवहाराशी माझा प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष संबंध असल्याचे पुराव्यानिशी सिद्ध झाले, तर एका मिनिटाचाही विलंब न लावता सार्वजनिक जीवनातून कायमची निवृत्ती स्वीकारेन,” अशी स्पष्ट आणि ठाम भूमिका त्यांनी मांडली आहे.

नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओ संदेशातून वळसे पाटील यांनी या विषयावर प्रथमच सविस्तर भाष्य केले. गेल्या काही दिवसांपासून आंबेगाव तालुक्यातील काही विरोधकांकडून दूध भेसळ प्रकरणाशी त्यांचे नाव जोडण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे सांगत त्यांनी हे आरोप पूर्णपणे निराधार आणि राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे म्हटले आहे.

राज्यात अन्न व औषध प्रशासन (एफडीए) दूध व्यवसायाशी संबंधित विविध ठिकाणी तपासणी करून कारवाई करीत आहे. ही प्रक्रिया कायद्याच्या चौकटीत सुरू असून, त्याला आपण संपूर्ण पाठिंबा देत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “भेसळ करणारी व्यक्ती, संस्था किंवा कंपनी कोणतीही असो, अशा कोणालाही कायद्यापासून संरक्षण मिळू नये, हीच माझी भूमिका आहे. एफडीए आणि पोलीस यंत्रणा दोषींवर कठोर कारवाई करण्यास सक्षम असून, कायद्यापुढे सर्व समान आहेत,” असेही ते म्हणाले.

यावेळी त्यांनी विरोधकांवर गंभीर आरोपही केले. “स्वतःचे राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी काही जण खोटे, बिनबुडाचे आणि दिशाभूल करणारे आरोप करून समाजात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. जनतेची दिशाभूल करून राजकीय लाभ मिळविण्याचा हा प्रकार दुर्दैवी आहे,” असे ते म्हणाले. या प्रकाराला यापुढे कायदेशीर उत्तर दिले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. “माझी आणि माझ्या कुटुंबाची जाणीवपूर्वक बदनामी करण्याचे प्रकार तातडीने थांबवले नाहीत, तर संबंधितांविरुद्ध उच्च न्यायालयात फौजदारी कारवाईसह मोठ्या रकमेचा अब्रूनुकसानीचा दावा दाखल करण्यात येईल,” असे त्यांनी स्पष्ट केले.

वळसे पाटील यांनी आपल्या दीर्घ राजकीय कारकिर्दीचाही उल्लेख केला. “गेली अनेक दशके जनतेच्या विश्वासाच्या बळावर मी सार्वजनिक जीवनात कार्यरत आहे. स्वच्छ, पारदर्शक आणि विकासाभिमुख राजकारण हीच माझी ओळख राहिली आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या अफवा किंवा बिनबुडाच्या आरोपांमुळे सत्य बदलणार नाही,” असे त्यांनी नमूद केले.

‘सत्याचाच विजय होईल’असे त्यांनी स्पष्ट केले आहे. 1990 पासून आज तागायत 36 वर्ष आंबेगाव तालुक्याचा कायापालट करण्यात मोठे योगदान आहे. दुष्काळी तालुका ही ओळख पुसण्यातही दिलीप वळसे पाटील तसेच यापूर्वीचे आमदार सर्वस्वी स्वर्गीय अण्णासाहेब आवटे, स्व वेणूताई आवटे, दत्तात्रय वळसे पाटील, किसनराव बाणखेले, बी. डी अण्णा काळे, शिवाजीराव बेंडे पाटील यांचेही खूप मोठे योगदान आहे. दिलीप वळसे पाटील यांनी खऱ्या अर्थाने राजकारणाची दिशा आंबेगाव तालुक्यात अनेकांनादाखवली. अनेक पदे बहाल केली. त्यांनीच वळसे पाटील यांच्या कार्यकर्तृत्वावर बोट दाखवावे ही अत्यंत दुर्दैवी व संताप जनक बाब आहे. त्यांच्या ह्या व्हिडिओला जनतेकडून उस्फूर्त प्रसाद मिळत असून विरोधकांच्या बिन बुडाबाबतही जोरदार चर्चा सुरू आहे.

“मी आयुष्यभर स्वच्छ, पारदर्शक आणि जनतेच्या विश्वासावर आधारित राजकारण केले आहे. सत्य जनतेसमोर येईल आणि सत्याचाच विजय होईल. नागरिक, समाजमाध्यमे आणि प्रसारमाध्यमांनी वस्तुस्थितीची पडताळणी करूनच भूमिका घ्यावी,” असे आवाहनही माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले.

हे सुद्धा वाचा : वन विभागाचे जिओ-टॅग्ड अ‍ॅप ठरतेय पर्यटकांसाठी आकर्षण; एका क्लिकवर 45 पर्यावरणपूरक पर्यटनस्थळे

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra