- उंब्रज ग्रामपंचायतीच्या कचरा डेपोविरोधात मनसे आक्रमक
- तहसीलदार व गटविकास अधिकाऱ्यांकडे तातडीच्या कारवाईची मागणी
- वाचा सविस्तर बातमी!
निवेदनात म्हटले आहे की, लोकवस्तीच्या मागील बाजूस तसेच राष्ट्रीय महामार्गापासून अवघ्या काही मीटर अंतरावर गावातील संपूर्ण घनकचरा टाकला जात असून तो दररोज जाळला जात आहे. त्यामुळे निर्माण होणारा विषारी धूर परिसरातील घरांमध्ये शिरत असून लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, महिला आणि दम्याच्या रुग्णांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत. नागरिकांना श्वसनाचा त्रास, खोकला, डोकेदुखी, डोळ्यांची जळजळ व त्वचारोगांचा सामना करावा लागत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
याशिवाय सदर कचरा डेपो राष्ट्रीय महामार्ग आणि नदीसारख्या स्थानिक जलस्रोतांच्या अत्यंत जवळ असल्याने पर्यावरण व पाण्याचे प्रदूषण वाढत असल्याचीही चिंता व्यक्त करण्यात आली आहे. गेल्या दहा वर्षांपासून नागरिकांनी ग्रामपंचायतीकडे वारंवार लेखी तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नसल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
मनसेने प्रशासनाकडे घनकचरा व्यवस्थापनासाठी लोकवस्तीपासून दूर पर्यावरणपूरक जागा तातडीने निश्चित करावी, सध्याचा कचरा त्वरित हटवून जागेचे निर्जंतुकीकरण करावे, भविष्यात त्या ठिकाणी कचरा टाकणे व जाळण्यास कायमस्वरूपी बंदी घालावी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि आरोग्य विभागामार्फत हवा व पाण्याची तपासणी करावी तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ स्थळ पाहणी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशा प्रमुख मागण्या केल्या आहेत.
या निवेदनावर मनसेचे सातारा जिल्हा सचिव अमोल सुभाष कांबळे, कराड तालुका अध्यक्ष रणजीत कदम, उंब्रज शहराध्यक्ष विजय वाणी यांच्यासह संदीप राठोड, विक्रम भंडारे, संतोष किरतकर्वे, प्रविण चव्हाण, आशिष धावारे, अशोक गाडे, विजय पवार, सुमित चव्हाण, शंभू रोकडे तसेच परिसरातील महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अन्य रहिवाशांच्या स्वाक्षऱ्या आहेत. मनसेने इशारा दिला असून, प्रशासनाने तातडीने या प्रश्नाची दखल घेतली नाही तर नागरिकांना सोबत घेऊन तीव्र लोकआंदोलन छेडण्यात येईल, असा स्पष्ट इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.

