सातारा : सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) यांच्याकडून अभयसिंह खाशेराव जगताप यांना अधिकृत उमेदवारी देण्यात आली आहे.
पक्षाचा अधिकृत एबी फॉर्म सादर झाल्याने त्यांची उमेदवारी वैध ठरली असून उमेदवारीबाबत सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. दुसरीकडे बाळासाहेब ऊर्फ प्रताप पाटील हे अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात कायम राहणार आहेत.
मंगळवारी पार पडलेल्या अर्ज छाननी प्रक्रियेत एकूण आठ उमेदवारांनी दाखल केलेल्या अर्जांची तपासणी करण्यात आली. यामध्ये सात उमेदवारांचे एकूण अकरा अर्ज वैध ठरविण्यात आले. अपक्ष उमेदवार सीमा सुनील पोतदार यांनी सादर केलेल्या दोन्ही अर्जांमध्ये आवश्यक कागदपत्रे व शपथपत्र अपूर्ण असल्याचे निदर्शनास आल्याने त्यांचे अर्ज नामंजूर करण्यात आले.
छाननीनंतर निवडणुकीच्या मैदानात राहिलेल्या उमेदवारांमध्ये महायुतीचे धैर्यशील ज्ञानदेव कदम, राष्ट्रवादी काँग्रेसचे अभयसिंह जगताप, तसेच अपक्ष उमेदवार प्रताप धोंडिराम पाटील, मयूर बाबासाहेब पाटील, संजय नायकू मेढे, तानाजी भगवान पाटील आणि किशोर हणमंत धुमाळ यांचा समावेश आहे.
किशोर धुमाळ यांच्या अर्जावरील काही प्रस्तावकांच्या सह्यांबाबत हरकत घेण्यात आली होती. यासंदर्भात सुनावणी झाल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी संबंधित हरकती फेटाळून अर्ज वैध ठरवला. या मतदारसंघात सातारा जिल्ह्यातील ४२३ आणि सांगली जिल्ह्यातील ४७२ असे एकूण ८९५ स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी मतदान करणार आहेत.
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत ४ जूनपर्यंत असून त्यानंतर अंतिम उमेदवारांची यादी जाहीर होईल. सध्या तरी महायुतीचे धैर्यशील कदम आणि राष्ट्रवादीचे अभयसिंह जगताप यांच्यात मुख्य लढत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
महायुतीच्या १७ अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर
महायुतीमधील बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर, १७ अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर करून एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीमध्ये झालेल्या बंडखोरीनंतर, आघाडीने एक मोठा निर्णय घेतला आहे. महायुतीने आपल्या अधिकृत उमेदवारांची नावे जाहीर केली असून, बंडखोरांना आपली उमेदवारी मागे घेण्याचे आवाहनही केले आहे.

