Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
बेकायदेशीर मासेमारी करणाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा! अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समिती आक्रमक

बेकायदेशीर मासेमारी करणाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा! अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समिती आक्रमक

मुंबई : महाराष्ट्राच्या समुद्रकिनाऱ्यावर पावसाळी मासेमारी बंदीच्या कालावधीत होणाऱ्या बेकायदेशीर मासेमारीला आळा घालण्यासाठी अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीने (एएमएमकेएस) राज्य सरकारकडे अत्यंत आक्रमक आणि कठोर पावले उचलण्याची मागणी केली आहे.

बंदीच्या काळात बेकायदेशीरपणे समुद्रात जाऊन मासेमारी करताना अपघात किंवा खलाशाचा मृत्यू झाल्यास संबंधित नौका मालक आणि जिवंत खलाशांवर थेट सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी समितीचे अध्यक्ष देवेंद्र तांडेल यांनी मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

मत्स्यव्यवसायमंत्र्यांना पाठवलेल्या निवेदनात देवेंद्र तांडेल यांनी महाराष्ट्रातील मत्स्यव्यवसायाच्या सद्यस्थितीवर तीव्र चिंता व्यक्त केली आहे. महाराष्ट्रातील समुद्रात सध्या मासळीच्या साठ्यात कमालीची घट झाली असून योग्य पावले न उचलल्यास समुद्रात मासे शिल्लक राहणार नाहीत, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.

या संकटावर उपाय म्हणून जगभरातील अनेक देशांनी आणि शेजारील गुजरात राज्याने ७६ दिवसांपर्यंत बंदीचा कालावधी वाढवून निसर्ग संवर्धनाचे कडक नियम लागू केले आहेत.

मासेमारी बंदीचा कालावधी ७६ दिवसांचा करा!

गुजरातच्या धर्तीवर महाराष्ट्रातील पावसाळी मासेमारी बंदीचा कालावधी ७६ दिवसांचा करण्यात यावा, ही मच्छिमारांची सातत्यपूर्ण आणि प्रमुख मागणी आहे. या पार्श्वभूमीवर, मत्स्यव्यवसाय आयुक्त कार्यालयाने २० मे २०२५ रोजी मत्स्यव्यवसाय सचिवांना याबाबतचे अंतिम आदेश पारित करण्याची विनंती केली असल्याची माहिती अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे पालघर जिल्हाध्यक्ष विनोद पाटील यांनी दिली.

प्रमुख मागण्या

  • बंदीचा कालावधी ७६ दिवस करा !

केंद्रीय सागरी मत्स्य संशोधन संस्थेच्या (सीएमएफआरआय) अहवालानुसार आणि गुजरात सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्रातील पावसाळी मासेमारी बंदीचा कालावधी ६१ दिवसांवरून वाढवून ७६ दिवस (१ जून ते १५ ऑगस्ट २०२६) करण्यात यावा.

  • परवाना रद्द आणि १० लाखांचा दंड

बंदीच्या काळात समुद्रात जाणाऱ्या कोणत्याही नौकेचा परवाना कायमचा रद्द करून त्यांना १० लाख रुपयांपर्यंत दंड ठोठावावा.

  • पुरवठा साखळी, वाहतुकीवर बंदी

महाराष्ट्रातील बंदीच्या काळातील बेकायदेशीर मासे वाहून नेणाऱ्या गाड्या, ट्रक्स आणि बेकायदेशीरपणे मासळी खरेदी-विक्री करणारे व्यापारी, घाऊक विक्रेते यांच्यावरही कठोर दंडात्मक कारवाई करून त्यांचे व्यावसायिक परवाने रद्द करावेत.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Navshakti