स्वीटी भागवत/मुंबई
प्रस्तावित ठाणे-ऐरोली खाडीपुलाच्या उभारणीची प्रक्रिया एक पाऊल पुढे सरकली असून हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी तीन पायाभूत सुविधा कंपन्यांनी स्वारस्य दाखवले आहे.
सुमारे ७०० कोटी रुपये अंदाजित खर्च असलेल्या १.४ किलोमीटर लांबीच्या प्रस्तावित केबल-स्टे पुलामुळे ठाणे आणि नवी मुंबईदरम्यानची कनेक्टिव्हिटी लक्षणीयरीत्या सुधारण्याची शक्यता आहे.
या प्रकल्पासाठी 'अक्षया इन्फ्रा प्रोजेक्ट्स,' 'हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन कंपनी' (एचसीसी) आणि 'स्पीकॉन इन्फ्रास्ट्रक्चर' या तीन कंपन्यांनी निविदा सादर केल्या आहेत.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून आता अंतिम बांधकाम यंत्रणेची निवड करण्यापूर्वी त्यांच्या तांत्रिक आणि आर्थिक निविदांचे मूल्यमापन केले जाईल. 'एमएमआरडीए'ने हे काम २०३० पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.
हा प्रस्तावित सहा पदरी पूल ठाण्यातील कोपरी परिसर आणि नवी मुंबईतील ऐरोलीला थेट जोडेल. ठाणे रेल्वे स्थानकापासून सुमारे ७०० मीटर अंतरावर असलेल्या मिठी बंदर रस्त्याजवळून हा पूल सुरू होईल आणि ठाणे खाडी पार करून ऐरोलीतील पटणी परिसराजवळ उतरेल. सध्या ठाण्यातून ऐरोली आणि नवी मुंबईच्या इतर भागात प्रवास करणाऱ्या बहुतांश वाहनचालकांना कळवा पूल आणि ठाणे-बेलापूर रस्त्याचा वापर करावा लागतो. ही कोंडी टाळण्यासाठी अनेक प्रवासी ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेने प्रवास करून ठाणे किंवा नवी मुंबई गाठतात.
प्रवाशांचा प्रवास सुखकर होणार
हा नवीन खाडीपूल पूर्ण झाल्यानंतर ठाणे रेल्वे स्थानकाच्या परिसरातून ऐरोलीसाठी थेट पर्यायी मार्ग उपलब्ध होणार आहे. या प्रकल्पामुळे कळवा पुलावरील वाहतुकीचा ताण कमी होण्यास मदत होईल, ठाणे-बेलापूर रस्त्यावरील कोंडी सुटेल आणि दररोज प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांचा प्रवास अधिक जलद व सोयीस्कर होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
प्रकल्पाचा आढावा
प्रकल्प: ठाणे-ऐरोली खाडीपूल
लांबी: १.४ किमी
प्रकार: सहा पदरी केबल-स्टेड पूल
अंदाजित खर्च: ७०० कोटी रुपये
पूर्णत्वाचे लक्ष्य: २०३०
सुरुवात: मिठी बंदर रोडजवळ, ठाणे रेल्वे स्थानकापासून सुमारे ७०० मीटर अंतरावर
समाप्ती: ऐरोलीतील पटणी परिसर
शर्यतीतील कंपन्या
हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन कंपनी (एचसीसी)
अक्षय इन्फ्रा प्रोजेक्ट्स
स्पेकॉन इन्फ्रास्ट्रक्चर
(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

