वैभव सूर्यवंशीचे पहिले आंतरराष्ट्रीय अर्धशतक कुटुंबाला समर्पित
झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात अवघ्या १८ चेंडूत झंझावाती अर्धशतक झळकावणाऱ्या भारताच्या १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिले अर्धशतक आई, कुटुंब आणि प्रशिक्षकांना समर्पित केले.
अर्धशतक पूर्ण केल्यानंतर केलेले त्याचे खास सेलिब्रेशन हे आई आरती यांच्यासाठी असल्याचा भावनिक खुलासा त्याने केला.
बीसीसीआय टीव्हीशी बोलताना वैभव म्हणाला, 'कारकिर्दीच्या सुरुवातीलाच अशी खेळी करता आली, तर पुढील सामन्यांसाठी आत्मविश्वास वाढतो. मी माझ्या नैसर्गिक खेळीवर भर दिला. हे अर्धशतक माझ्या कुटुंबाला, प्रशिक्षकांना आणि चांगल्या-वाईट काळात माझ्या पाठीशी उभ्या राहिलेल्या प्रत्येकाला समर्पित आहे.'
अर्धशतक पूर्ण झाल्यानंतर वैभवने दोन्ही हातांनी डोक्यावर 'A' हे चिन्ह तयार केले होते. याबाबत विचारले असता तो म्हणाला, 'ते सेलिब्रेशन माझ्या आईसाठी होते. त्यानंतर केलेला 'थम्ब्स अप' हा रिंकू सिंगसोबत झालेल्या चर्चेचा भाग होता.'
१५ वर्षे ११८ दिवसांच्या वयात वैभवने अवघ्या १९ चेंडूत ५० धावांची तुफानी खेळी केली. या खेळीत त्याने ४ चौकार आणि ४ षटकार लगावले. यासह टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात कमी वयात अर्धशतक झळकावणारा फलंदाज होण्याचा मान त्याने पटकावला. त्याने लुई ब्रूसचा विक्रम मोडला. तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात कमी वयात अर्धशतक करणाऱ्या नेपाळच्या कुशल मल्लालाही मागे टाकले.
हरारेचे मैदान वैभवसाठी यंदा विशेष भाग्यवान ठरले आहे. याच मैदानावर यावर्षी झालेल्या आयसीसी अंडर-१९ विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात त्याने इंग्लंडविरुद्ध ८० चेंडूत १७५ धावांची विस्फोटक खेळी केली होती. उपांत्य फेरीत अफगाणिस्तानविरुद्ध ६८ धावांचे योगदान देत भारताला विक्रमी सहावे जेतेपद मिळवून देण्यात त्याचा मोठा वाटा होता.
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत अपेक्षित कामगिरी करता आली नव्हती. मात्र झिम्बाब्वेविरुद्ध दमदार पुनरागमन करताना वैभव म्हणाला, 'काही मैदानांवर धावा करायला विशेष आवडते. हरारेही त्यापैकी एक असू शकते. पण मी ते गृहित धरत नाही. प्रत्येक वेळी संघासाठी सर्वोत्तम योगदान देण्याचाच माझा प्रयत्न असेल.'

