Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
भारताविरुद्ध मालिकेसाठी बांगलादेश उत्सुक

भारताविरुद्ध मालिकेसाठी बांगलादेश उत्सुक

NEWS डंका 2 weeks ago

बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे (बीसीबी) अध्यक्ष तमीम इक्बाल यांनी भारताविरुद्धची प्रस्तावित व्हाईट-बॉल मालिका भविष्यात नक्की होईल, अशी आशा व्यक्त केली आहे. दोन्ही देशांचे क्रिकेट बोर्ड योग्य वेळ आणि उपलब्ध विंडो शोधत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मूळ नियोजनानुसार ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये भारत आणि बांगलादेश यांच्यात ३ वनडे आणि ३ टी-२० सामने खेळवले जाणार होते. मात्र, १३ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या भारत-अफगाणिस्तान टी-२० मालिकेमुळे ही मालिका पुढे ढकलण्यात आली.

यूट्यूबवरील 'नॉट आउट नोमान' या कार्यक्रमात बोलताना तमीम म्हणाले, 'भारताविरुद्धची मालिका रद्द झालेली नाही. बीसीसीआय आणि बीसीबी दोन्ही बोर्ड या मालिकेबाबत गंभीर आहेत. योग्य वेळ मिळाल्यास ही मालिका आयोजित करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.'

यंदाच्या सुरुवातीला भारतात होणाऱ्या २०२६ महिला टी-२० विश्वचषकापूर्वी दोन्ही बोर्डांमधील संबंध तणावपूर्ण झाले होते. सुरक्षेचे कारण देत बांगलादेशने स्पर्धेतून माघार घेतली होती. याच काळात वेगवान गोलंदाज मुस्तफिझुर रहमान यालाही आयपीएल २०२६ मधील कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) करारातून मुक्त करण्यात आले होते.

या प्रकरणावर भाष्य करताना तमीम यांनी मान्य केले की, बांगलादेश प्रशासनाकडून काही चुका झाल्या. राजकीय वादांमुळे आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांवर परिणाम होऊ नये, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

'मुस्तफिझुरच्या प्रकरणामुळे संपूर्ण देश निराश झाला होता. काही गोष्टी अधिक चांगल्या पद्धतीने हाताळता आल्या असत्या. खेळाला खेळ म्हणूनच पाहिले पाहिजे. अनेकदा राजकीय किंवा इतर कारणांमुळे खेळावर परिणाम होतो, पण तसे होऊ नये,' असे तमीम म्हणाले.

तसेच, 'काही प्रसंगी खेळ आणि राजकारण वेगळे ठेवणे आवश्यक असते. आम्ही महिला टी-२० विश्वचषकात सहभागी व्हायला हवे होते आणि संवादही अधिक प्रभावीपणे साधायला हवा होता,' असेही त्यांनी नमूद केले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka