पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या वर्षपूर्तीला युरोपियन युनियनचे विधान
पहलगाम दहशतवादी हल्ल्याला एक वर्ष उलटून गेल्यानंतरही या हल्ल्याच्या आठवणी अजूनही ताज्या आहेत. दरम्यान, युरोपियन युनियन मधील २७ देशांनी भारताच्या समर्थनार्थ संयुक्त निवेदन जारी केले आहे.
या भीषण हल्ल्याचा त्यांनी तीव्र शब्दांत निषेध केला आहे. भारतातील आयरिश दूतावासाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर ईयूचे निवेदन प्रसिद्ध केले. ईयूने या हल्ल्याला 'निंदनीय' ठरवत दहशतवादाविरुद्ध भारतासोबत एकजूट व्यक्त केली आहे.
आपल्या निवेदनात ईयूने म्हटले आहे की, निरपराध नागरिकांना लक्ष्य करणे कोणत्याही परिस्थितीत मान्य होऊ शकत नाही आणि अशा हल्ल्यांसाठी जबाबदार असलेल्या व्यक्तींना न्यायालयासमोर उभे केले पाहिजे. या कठीण काळात पीडित आणि त्यांच्या कुटुंबीयांप्रती त्यांनी सखोल संवेदना व्यक्त केल्या. तसेच त्यांनी स्पष्ट केले की, आम्ही दहशतवादी हल्ल्यांच्या विरोधात आहोत आणि युरोपियन युनियन भारतासोबत ठामपणे उभा आहे. या हिंसक कृत्याचा आम्ही तीव्र निषेध करतो.
ईयू एकटाच नाही, तर जगातील अनेक देशांनीही या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त २६ निरपराध बळींना श्रद्धांजली अर्पण केली. सर्वांनी एकमुखाने सांगितले की ही घटना अत्यंत घृणास्पद होती आणि ती कोणत्याही परिस्थितीत स्वीकारार्ह नाही. इस्त्रायल, अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया यांसह अनेक देशांच्या दूतावासांनी सोशल मीडियाद्वारे श्रद्धांजली अर्पण केली.
कर्नाटकमधील होमस्टेमध्ये अमेरिकन पर्यटकावर बलात्कार
ट्रम्प यांचा यू-टर्न; इराणसोबतचा शस्त्रसंधी करार वाढवला
'भारताविरुद्धच्या कृत्यांना प्रत्युत्तर निश्चित!'
२२ एप्रिल २०२५ रोजी पहलगाम येथील बैसरन दरीत आपल्या कुटुंबासह सुट्टीसाठी आलेल्या २६ निःशस्त्र नागरिकांवर दहशतवाद्यांनी गोळीबार केला. यात २५ पर्यटक आणि एक पोनीवालाही समाविष्ट होता. या हल्ल्यानंतर भारताने ७-८ मेच्या रात्री नियोजित कारवाई करत पाकिस्तानमधील नऊ दहशतवादी ठिकाणांवर हल्ले केले. या कारवाईत १०० हून अधिक दहशतवादी ठार करण्यात आले. या संपूर्ण मोहिमेला 'ऑपरेशन सिंदूर' असे नाव देण्यात आले. भारताने यावेळी स्पष्ट केले होते की दहशतवादाविरुद्ध त्यांची भूमिका 'शून्य सहनशीलता' आहे आणि कोणत्याही स्वरूपात तो स्वीकारला जाणार नाही.

