Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
एन. चंद्रशेखरन यांच्या राजीनाम्यानंतर टाटा समूहाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण

एन. चंद्रशेखरन यांच्या राजीनाम्यानंतर टाटा समूहाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण

गुंतवणूकदारांचे सुमारे ₹४४ हजार कोटींचे बाजारमूल्य कमी

टाटा समूहाचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी टाटा सन्सच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची बातमी समोर येताच शेअर बाजारात टाटा समूहाच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली.

या घडामोडीचा थेट परिणाम गुंतवणूकदारांच्या भावना आणि समूहाच्या प्रमुख कंपन्यांच्या बाजारमूल्यावर दिसून आला. बुधवारी व्यवहारादरम्यान टाटा समूहातील प्रमुख कंपन्यांच्या शेअर्समध्ये तब्बल ४ टक्क्यांपर्यंत घसरण नोंदवण्यात आली.

एन. चंद्रशेखरन यांनी आपल्या विद्यमान कार्यकाळानंतर पुन्हा अध्यक्षपदासाठी नियुक्ती स्वीकारणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यांचा सध्याचा कार्यकाळ फेब्रुवारी २०२७मध्ये संपणार होता. मात्र, १८ ऑगस्ट रोजी होणाऱ्या टाटा सन्सच्या वार्षिक सर्वसाधारण सभेपूर्वीच त्यांनी पद सोडण्याचा निर्णय घेतल्याने टाटा समूहाच्या नेतृत्वबदलाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

या निर्णयाचा सर्वाधिक फटका टाटा समूहातील आयटी क्षेत्रातील आघाडीची कंपनी टीसीएसला बसला. टीसीएसच्या शेअरमध्ये सुमारे ४.२ टक्क्यांची घसरण झाली. त्याचबरोबर टाटा मोटर्सचा शेअर सुमारे २.५ टक्क्यांनी घसरला, तर टायटन आणि टाटा स्टीलच्या शेअर्समध्येही जवळपास २ टक्क्यांची घसरण झाली. या घसरणीमुळे टाटा समूहातील सूचीबद्ध कंपन्यांच्या एकत्रित बाजारमूल्यात मोठी घट झाली असून, काही अहवालांनुसार गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे ४४ हजार कोटी रुपयांची घट झाली.

आयएसआय लिंक प्रकरणी दोघांना अटक; एक पाकिस्तानी असल्याचा संशय

शाळा-कॉलेजजवळ असलेल्या १५०० पानटपऱ्या हटवल्या

२४ तास चर्चा करा, मी सगळ्या प्रश्नांची उत्तरे देतो!

चंद्रशेखरन यांनी २०१७मध्ये टाटा सन्सची धुरा स्वीकारली होती. त्यापूर्वी त्यांनी टीसीएसचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम केले होते. त्यांच्या नेतृत्वाखाली टाटा समूहाने डिजिटल व्यवसाय, इलेक्ट्रॉनिक्स, एअर इंडिया आणि इलेक्ट्रिक वाहनांसारख्या नव्या क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर विस्तार केला. मात्र, नव्या व्यवसायांमधील तोटा, एअर इंडियाची आर्थिक कामगिरी आणि समूहाच्या काही कंपन्यांसमोरील व्यावसायिक आव्हानांमुळे त्यांच्या नेतृत्वाच्या पुढील मुदतीबाबत काही काळापासून चर्चा सुरू होती.

चंद्रशेखरन यांच्या राजीनाम्यामुळे आता टाटा समूहाच्या पुढील नेतृत्वाकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे. टाटा ट्रस्ट्सकडे टाटा सन्समध्ये सुमारे ६६ टक्के हिस्सा असल्याने समूहाच्या नेतृत्वाबाबत ट्रस्ट्सची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे आगामी काळात नव्या अध्यक्षाची निवड, समूहाची रणनीती आणि विविध नव्या व्यवसायांबाबतचे निर्णय यांचा टाटा समूहाच्या कंपन्यांच्या शेअर्सवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

चंद्रशेखरन यांच्या राजीनाम्याने टाटा समूहाच्या जवळपास दशकभराच्या नेतृत्वाच्या एका महत्त्वपूर्ण पर्वाला आता कलाटणी मिळाली आहे. त्यामुळे नेतृत्वबदलासोबतच समूहाच्या भविष्यातील व्यावसायिक दिशा आणि गुंतवणूकदारांचा विश्वास टिकवून ठेवण्याचे मोठे आव्हान आता टाटा समूहासमोर असणार आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka