अरुण जेटली स्टेडियमवर गुजरात टायटन्सविरुद्ध अवघ्या १ धावांनी झालेल्या पराभवानंतर दिल्ली कॅपिटल्सच्या खेळाडूंमध्ये निराशा पसरली असली, तरी कर्णधार अक्षर पटेलने संघाला सकारात्मक राहण्याचा सल्ला दिला आहे.
अक्षर पटेल म्हणाला, 'स्पर्धेच्या सुरुवातीलाच आपण भावनांवर नियंत्रण ठेवायचं ठरवलं होतं. सध्या सगळ्यांना वाईट वाटतंय, पण हरकत नाही… आपण हसत राहू शकतो. हा मोठा टूर्नामेंट आहे. आम्ही चेन्नईला जाऊ आणि पुन्हा नव्याने सुरुवात करू.'
या सामन्यात गुजरातने प्रथम फलंदाजी करत २१० धावा केल्या होत्या. लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्ली विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचली होती. शेवटच्या षटकात १३ धावांची गरज असताना सामना पूर्णपणे दिल्लीच्या बाजूने झुकलेला दिसत होता.
पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्यावर विकेट आणि तिसऱ्यावर सिंगल झाल्यानंतर समीकरण शेवटच्या ३ चेंडूंवर ८ धावांचे झाले. डेव्हिड मिलरने चौथ्या चेंडूवर षटकार ठोकत सामना पुन्हा जिवंत केला. आता २ चेंडूंवर २ धावा हव्या होत्या, पण मिलरने सिंगल घेतली नाही — आणि याच क्षणी सामना फिरला.
शेवटच्या चेंडूवर धाव घेण्याच्या प्रयत्नात कुलदीप यादव धावबाद झाला आणि दिल्लीच्या हातून जिंकलेला सामना निसटला. मिलरने २० चेंडूत ४१ धावा केल्या, पण विजय मिळवून देण्यात अपयशी ठरला.
गुजरात टायटन्ससाठी हा हंगामातील पहिला विजय ठरला, तर दिल्ली कॅपिटल्सला पहिला पराभव स्वीकारावा लागला. आता दिल्लीचा पुढील सामना ११ एप्रिलला चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध होणार असून, त्या सामन्यात संघ नव्या जोमाने उतरणार असल्याचा विश्वास अक्षर पटेलने व्यक्त केला आहे.

