रेश्मा पारधी यांना दिलासा
पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील नंबरवाडी अंगणवाडीतील चिमुकल्यांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहाराच्या निकृष्ट गुणवत्तेचा मुद्दा समोर आणणाऱ्या अंगणवाडी सेविका रेश्मा पारधी यांच्यावरील निलंबनाची कारवाई अखेर रद्द करण्यात आली आहे.
पारधी यांनी अंगणवाडीत आलेला पांढरा वाटाणा आणि भरडा खराब दर्जाचा असल्याचा आरोप केला होता. हा वाटाणा पाण्यात भिजवून कुकरमध्ये अनेक शिट्ट्या देऊनही व्यवस्थित शिजत नसल्याचा व्हिडीओ त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला होता.
या घटनेनंतर अंगणवाडीतील मुलांना दिल्या जाणाऱ्या आहाराच्या गुणवत्तेवर प्रश्न उपस्थित झाले. पारधी यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडेही याबाबत तक्रार केली होती. मात्र, निकृष्ट आहाराचा मुद्दा समोर आणल्यानंतर त्यांच्यावरच शिस्तभंगाची कारवाई करून निलंबन करण्यात आले. त्यामुळे प्रशासनाच्या या निर्णयावर मोठ्या प्रमाणात टीका झाली.
रशियन तेल टँकर प्रकरणात भारतीय कॅप्टनला ब्रिटनमध्ये अटक
रेश्मा पारधी यांच्या निलंबनानंतर विविध स्तरातून त्यांना पाठिंबा मिळाला. निकृष्ट आहार पुरवणाऱ्यांवर कारवाई करण्याऐवजी त्याचा मुद्दा उपस्थित करणाऱ्या सेविकेवर कारवाई का करण्यात आली, असा सवाल उपस्थित करण्यात आला. या प्रकरणामुळे प्रशासनावरही दबाव वाढला.
अखेर वाढता जनक्षोभ लक्षात घेऊन प्रशासनाने रेश्मा पारधी यांचे निलंबन रद्द करण्याचा निर्णय घेतला. संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून पोषण आहाराचा दर्जा का खराब होता आणि असा आहार अंगणवाडीपर्यंत कसा पोहोचला, याची माहिती घेतली जाणार आहे. त्यामुळे निलंबन रद्द झाल्याने पारधी यांना दिलासा मिळाला असला, तरी अंगणवाडीतील मुलांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहाराच्या गुणवत्तेबाबत आता प्रशासन काय कारवाई करते, याकडे लक्ष लागले आहे.

