सोन्याचा साठा ११ लाख कोटींवर, दोन वर्षांत हिस्सा दुप्पट
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) तिजोरीतील सोन्याचे महत्त्व गेल्या काही वर्षांत लक्षणीय वाढले असून, आता या सोन्याच्या साठ्याचे मूल्य जवळपास ११ लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचले आहे.
जागतिक बाजारात सोन्याच्या किमतींनी विक्रमी उंची गाठल्याने आणि डॉलरच्या तुलनेत रुपयामध्ये झालेल्या घसरणीमुळे RBI कडे असलेल्या सोन्याच्या साठ्याचे मूल्य झपाट्याने वाढले आहे. विशेष म्हणजे, भारताच्या परकीय चलन साठ्यातील सोन्याचा वाटा अवघ्या दोन वर्षांत दुप्पट झाला आहे.
RBI च्या वार्षिक अहवालानुसार, ३१ मार्च २०२६ रोजी केंद्रीय बँकेकडे एकूण ८८०.५२ मेट्रिक टन सोने होते. त्याआधीच्या वर्षी हा साठा ८७९.५८ मेट्रिक टन होता. म्हणजे सोन्याचे प्रमाण फारसे वाढले नसले तरी त्याच्या किमतींमध्ये झालेल्या मोठ्या वाढीमुळे साठ्याचे एकूण मूल्य विक्रमी पातळीवर पोहोचले आहे.
पाकिस्तानी दहशतवादी नेटवर्कशी संबंध असलेला मोहम्मद शेख अटकेत
भारताच्या व्यापार करारांमुळे जागतिक बाजारपेठेची दारे होणार खुली
चलनाला आधार देणाऱ्या इश्यू विभागाकडे असलेल्या सोन्याचे मूल्य एका वर्षात तब्बल ६४ टक्क्यांनी वाढून ३.८८ लाख कोटी रुपयांवर गेले आहे. त्याचवेळी बँकिंग विभागाकडे असलेल्या सोने आणि गोल्ड डिपॉझिट्सचे मूल्य ७.०६ लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचले आहे. मार्च २०२६ अखेरीस RBI च्या एकूण सोन्याचे मूल्य ९.४३ लाख कोटी रुपये होते. मात्र, मे २०२६ च्या उत्तरार्धात हे मूल्य वाढून १०.९९ लाख कोटी रुपये, म्हणजेच जवळपास ११ लाख कोटी रुपयांवर पोहोचले.
परकीय चलन साठ्यातील सोन्याचा वाढता वाटाही लक्षवेधी ठरला आहे. मार्च २०२४ मध्ये RBI च्या नेट फॉरेन अॅसेट्समध्ये सोन्याचा वाटा केवळ ८.३ टक्के होता. तो मार्च २०२५ मध्ये १२ टक्क्यांवर पोहोचला आणि मार्च २०२६ अखेरीस तब्बल १७.२ टक्क्यांपर्यंत वाढला. यावरून जागतिक आर्थिक अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर RBI सोने हा सुरक्षित आणि विश्वासार्ह मालमत्ता वर्ग मानत असल्याचे स्पष्ट होते.
रिझर्व्ह बँकेने परदेशात ठेवलेले सोने भारतात आणण्याचाही वेग वाढवला आहे. आर्थिक वर्ष २०२५-२६ दरम्यान तब्बल १६८.०६ मेट्रिक टन सोने भारतात परत आणण्यात आले. याआधी २०२३-२४ मध्ये १०७.२१ मेट्रिक टन आणि २०२४-२५ मध्ये १०३.६८ मेट्रिक टन सोने भारतात आणले गेले होते. त्यामुळे RBI च्या सोन्याचा मोठा हिस्सा आता देशातच सुरक्षित ठेवला जात आहे.
दरम्यान, भारताचा एकूण परकीय चलन साठाही मजबूत होत आहे. ३१ मार्च २०२६ रोजी देशाचा परकीय चलन साठा ६५.५४ लाख कोटी रुपयांवर पोहोचला, जो मागील वर्षाच्या तुलनेत १४.७ टक्क्यांनी अधिक आहे. जागतिक आर्थिक अस्थिरतेच्या काळात सोन्यातील वाढती गुंतवणूक भारताच्या आर्थिक सुरक्षेला अधिक बळकटी देणारी ठरत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

