Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
सलग तिसऱ्यांदा पेट्रोल-डिझेल महाग

सलग तिसऱ्यांदा पेट्रोल-डिझेल महाग

अवघ्या दहा दिवसांत इंधनदरात जवळपास ₹५ वाढ

देशातील सर्वसामान्य नागरिकांना महागाईचा आणखी एक मोठा झटका बसला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात २३ मे रोजी सलग तिसऱ्यांदा वाढ करण्यात आली असून वाहनधारकांचा खर्च पुन्हा वाढला आहे.

सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोलच्या दरात सुमारे ८७ पैसे तर डिझेलच्या दरात ९१ पैशांपर्यंत वाढ केली आहे. त्यामुळे अवघ्या दहा दिवसांत पेट्रोल-डिझेल जवळपास ₹५ प्रति लिटरने महाग झाले आहे. वाढत्या इंधनदरामुळे आता वाहतूक खर्च वाढण्याची शक्यता निर्माण झाली असून त्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनावर होणार आहे.

नवीन दरांनुसार दिल्लीमध्ये पेट्रोल ₹९९.५१ तर डिझेल ₹९२.४९ प्रति लिटरवर पोहोचले आहे. मुंबईमध्ये पेट्रोल ₹१०८.४९ आणि डिझेल ₹९५.०२ प्रति लिटर इतके झाले आहे. कोलकात्यात पेट्रोल ₹११०.६४ तर डिझेल ₹९७.०२ प्रति लिटरवर गेले आहे. चेन्नईमध्येही पेट्रोल ₹१०५.३१ आणि डिझेल ₹९६.९८ प्रति लिटरवर पोहोचल्याने वाहनधारकांमध्ये नाराजी वाढली आहे. अनेक शहरांमध्ये पेट्रोलचे दर आधीच ₹११० च्या पुढे गेले असून आगामी काळात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मणिपूरमध्ये उग्रवाद्यांकडे सापडले ड्रोन जॅमर, इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर उपकरणे

पुलवामाचा मास्टरमाइंड हमझाच्या अंत्यविधीला नामचीन दहशतवादी

विशेष म्हणजे, १५ मे रोजी इंधनदरात जवळपास ₹३ ची मोठी वाढ करण्यात आली होती. त्यानंतर १९ मे रोजी पुन्हा दरवाढ झाली आणि आता २३ मे रोजी तिसऱ्यांदा किमती वाढवल्या गेल्या आहेत. त्यामुळे सामान्य नागरिकांचे मासिक बजेट पूर्णपणे कोलमडण्याची भीती निर्माण झाली आहे. खासगी वाहनधारकांसह टॅक्सी, रिक्षा आणि मालवाहतूक व्यवसायावर याचा मोठा परिणाम होणार आहे.

या दरवाढीमागे आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमती हे मुख्य कारण असल्याचे सांगितले जात आहे. पश्चिम आशियातील तणाव, इराणभोवती निर्माण झालेली अस्थिर परिस्थिती आणि पुरवठा साखळीवरील दबावामुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. काही दिवसांपूर्वी ७० ते ७२ डॉलर प्रति बॅरल असलेले कच्चे तेल आता १०० डॉलरच्या पुढे गेले आहे. भारत मोठ्या प्रमाणात कच्चे तेल आयात करत असल्याने जागतिक बाजारातील चढ-उतारांचा थेट परिणाम देशांतर्गत इंधनदरांवर होत आहे.

दरम्यान, इंधनदरवाढीमुळे मालवाहतूक खर्च वाढून अन्नधान्य, भाजीपाला, दूध, बांधकाम साहित्य आणि इतर अत्यावश्यक वस्तूंच्या किमती वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आधीच महागाईने त्रस्त असलेल्या नागरिकांना आणखी आर्थिक फटका बसण्याची भीती आहे. विरोधी पक्षांनीही या दरवाढीवरून केंद्र सरकारवर जोरदार टीका केली असून सामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी तातडीने करकपात करण्याची मागणी केली आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka