आप नेते सौरभ भारद्वाज यांची राघव चढ्ढा यांच्यावर टीका
आम आदमी पक्षाने राज्यसभा खासदार राघव चड्ढा यांना राज्यसभेतील उपनेतेपदावरून काढून टाकल्यामुळे पक्षातील अंतर्गत कलह उघडकीस आला.
अशातच आता पक्षाचे नेते हे खासदार राघव चड्ढा यांच्यावर टीका करत असून यापूर्वी राघव चड्ढा यांनीही त्यांच्या हकालपट्टीवर प्रतिक्रिया देत नाराजी व्यक्त केली होती. आप नेते सौरभ भारद्वाज यांनी राघव चड्ढा यांना सल्ला दिला की, त्यांनी संसदेच्या मर्यादित वेळेचा वापर 'सॉफ्ट पीआर' आणि 'समोशांबद्दल' बोलण्याऐवजी, भाजप नेतृत्वाखालील केंद्र सरकारला मोठ्या समस्यांवर निर्भयपणे प्रश्न विचारावेत.
राज्यसभेतील पक्षाच्या उपनेतेपदावरून हटवण्याच्या 'आप'च्या निर्णयावर राघव चड्ढा यांनी दिलेल्या पहिल्या प्रतिक्रियेला उत्तर देताना भारद्वाज यांनी टीका केली आहे. गुरुवारी राघव चड्ढा यांना राज्यसभा पदावरून हटवून त्यांच्या जागी अशोक मित्तल यांची नियुक्ती करण्याच्या निर्णयामुळे पक्षात अंतर्गत मतभेद असल्याचे समोर आले आहे. गुरुवारी चड्ढा शांत राहिले असले तरी, शुक्रवारी त्यांनी एक व्हिडिओ संदेश शेअर करत संसदेत जनहितार्थ मुद्दे मांडणे हा गुन्हा आहे का, असा प्रश्न विचारला.
चड्ढा यांच्या व्हिडिओला प्रत्युत्तर देताना, भारद्वाज यांनी म्हटले की, ते राज्याचे प्रश्न मांडायला का घाबरत आहेत आणि त्याऐवजी राज्यसभेत 'समोशांबद्दल' बोलत आहेत. 'राघव, मी तुमचा व्हिडिओ नुकताच पाहिला. आम्ही सर्व अरविंद केजरीवालजींचे सैनिक आहोत. आम्ही एकच गोष्ट शिकलो आहोत- 'जो डर गया, समझो मर गया'. लोकांचे प्रश्न मांडणे आणि सरकारच्या डोळ्यात डोळे घालून प्रश्न विचारणे हे आमचे काम होते,' असे भारद्वाज यांनी त्यांच्या व्हिडिओ प्रतिक्रियेत म्हटले. ते पुढे म्हणाले की, गेल्या काही दिवसांपासून असे दिसून आले आहे की, जो कोणी सरकारविरोधात गंभीर मुद्दे उपस्थित करतो, त्यावर प्रश्न विचारतो किंवा लोकांच्या वतीने बोलतो, त्याला शत्रूप्रमाणे वागवले जाते. तसेच, सरकारला 'सौम्य जनसंपर्क मुद्द्यांची' पर्वा नाही, असेही त्यांनी पुढे सांगितले.
'सरकार हुकूमशहासारखे वागत आहे— ट्विटर, फेसबुक किंवा यूट्यूबसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लोकांवर बंदी घालत आहे. एफआयआर दाखल केले जात आहेत आणि गुन्हे नोंदवले जात आहेत. संसदेतील सौम्य प्रसिद्धीपर भाषणांची सरकारला पर्वा नाही. लहान पक्षांना संसदेत बोलण्यासाठी खूपच मर्यादित वेळ मिळत असल्याने, तो वेळ क्षुल्लक बाबींऐवजी महत्त्वाचे राष्ट्रीय मुद्दे मांडण्यासाठी वापरला पाहिजे,' असे ते म्हणाले.
'नाही म्हणजे नाही!' ६ कोटी भरण्यासाठी अतिरिक्त वेळ मिळणार नाही
पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वामध्ये पोलीस ठाण्यावर आत्मघाती हल्ला
अमेरिकन F-35 लढाऊ विमान पाडले?
अमेरिकेचे नवीन टॅरिफ धोरण: औषधांवर १००% कर, धातूंना दिलासा
'देशभरात आपण पाहिले आहे की, निवडणुकांपूर्वी खऱ्या मतदारांची नावे काढून टाकली जातात आणि बनावट मते तयार केली जातात, ज्यामुळे सरकारला गैरमार्गाने यंत्रणेवर ताबा मिळवून निवडणुका जिंकता येतात. पश्चिम बंगालमध्येही तेच घडत आहे. अलीकडेच, जेव्हा विरोधी पक्षांनी मुख्य निवडणूक आयुक्तांवर महाभियोग चालवण्याचा प्रस्ताव आणण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तुम्ही त्यावर सही करण्यास नकार दिला. जेव्हा विरोधी पक्ष एखाद्या मुद्द्यावरून संसदेतून सभात्याग करतात, तेव्हा तुम्ही त्यात सामील होत नाही. गेल्या बऱ्याच काळापासून, तुम्ही संसदेत असा कोणताही मुद्दा उपस्थित केलेला मी पाहिलेला नाही, ज्यात तुम्ही पंतप्रधानांना किंवा भाजप सरकारला थेट प्रश्न विचारला असेल. अशा भीतीमध्ये राजकारण कसे चालू शकते. गुजरातमध्ये पक्षाच्या जवळपास १६० कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल झाले आणि त्यांच्याविरोधात एफआयआर नोंदवण्यात आले; अनेकांना अटकही झाली, तरीही तुम्ही गप्प राहिलात. जेव्हा आमचे अनेक नेते तुरुंगात होते आणि आमच्या मते एका खोट्या गुन्ह्यात मुख्यमंत्री असताना अरविंद केजरीवालजींना अटक झाली होती, तेव्हा तुम्ही देशातही नव्हता — तुम्ही निघून गेलात आणि लपून बसलात,' अशी टीका त्यांनी राघव चड्ढा यांच्यावर केली.

