Dailyhunt
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात 'वनराणी'ची पुन्हा शिट्टी वाजली!

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात 'वनराणी'ची पुन्हा शिट्टी वाजली!

NEWS डंका 1 month ago

केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते जनतेसाठी समर्पण

मुंबईकरांच्या आवडीची आणि मुलांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवणारी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील 'वनराणी' टॉय ट्रेन पुन्हा एकदा धावू लागली आहे.

केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री तसेच उत्तर मुंबईचे खासदार पीयूष गोयल यांनी शनिवारी या नव्याने आधुनिकीकरण केलेल्या टॉय ट्रेनचे जनतेसाठी लोकार्पण केले.

'जंगलची राणी' म्हणून ओळखली जाणारी ही टॉय ट्रेन १९७० च्या दशकापासून मुंबईकरांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू राहिली आहे. मात्र २०२१ मध्ये आलेल्या तौक्ते चक्रीवादळामुळे ट्रॅक आणि परिसराचे मोठे नुकसान झाल्याने ही सेवा बंद पडली होती. आता नव्या तंत्रज्ञानासह आणि पर्यावरणपूरक सुविधांसह वनराणी पुन्हा धावू लागली आहे.

नवीन टॉय ट्रेन बॅटरीवर चालणारी असून पूर्णपणे पर्यावरणपूरक आहे. यात आधुनिक कोच, अधिक सुरक्षितता आणि सुधारित स्टेशन सुविधा देण्यात आल्या आहेत.

ट्रेनमध्ये हेरिटेज कोच आणि व्हिस्टाडोम कोच ठेवण्यात आले आहेत. मोठ्या काचेच्या छतांमुळे आणि खिडक्यांमुळे प्रवाशांना जंगलाचा पॅनोरामिक अनुभव घेता येणार आहे.

या ट्रेनमध्ये चार कोच असून एकावेळी सुमारे ८० प्रवासी प्रवास करू शकतात. ट्रेन कृष्णगिरी उपवनातील ५.५ किमी परिसरातून धावणार असून मिनी झू, जैवविविधता क्षेत्र आणि कृत्रिम बोगद्यांतून प्रवास होईल.

लोकार्पणानंतर पीयूष गोयल यांनी स्वतः मुलांसोबत टॉय ट्रेनची सफर केली, ज्यामुळे लहान मुलांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला. उद्यानात आलेल्या कुटुंबांसाठीही हा क्षण संस्मरणीय ठरला.

या प्रसंगी बोलताना पीयूष गोयल म्हणाले,
'टॉय ट्रेन सुरू करण्यासाठी आपण VIP वेळापत्रकाची वाट पाहू नये. मुलांना आणि कुटुंबांना आनंद देणारी ही सेवा तात्काळ सुरू व्हावी, हीच माझी इच्छा होती.'

ते पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'विकास आणि शाश्वतता'च्या दृष्टिकोनातून आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारच्या सहकार्याने हा प्रकल्प पूर्ण झाला.

गोयल म्हणाले की, उत्तर मुंबई हा देशातील सर्वात सुंदर भागांपैकी एक आहे. 'एका बाजूला संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा विशाल हिरवा पट्टा, तर दुसऱ्या बाजूला अरबी समुद्र आहे. पुनर्विकास आणि गृहनिर्माण प्रकल्पांमुळे नागरिकांसाठी उत्तम जीवनमान निर्माण करण्याचे काम सुरू आहे.'

गोयल यांनी सांगितले की, कन्हेरी लेणींना जागतिक दर्जाचे वारसा स्थळ बनवण्याचा प्रयत्न सुरू आहे. सार्वजनिक-खासगी भागीदारीच्या माध्यमातून पर्यटकांसाठी आधुनिक सुविधा निर्माण केल्या जातील.

तसेच मांडपेश्वर लेणी आणि मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यांचे सौंदर्यीकरण करण्याचेही काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

कांदिवली येथील अटल बिहारी वाजपेयी कौशल्य विकास केंद्रात आतापर्यंत ५४ हजारांहून अधिक युवकांना प्रशिक्षण आणि रोजगाराच्या संधी मिळाल्या आहेत, असे गोयल यांनी सांगितले.

'उत्तर मुंबईतील कोणताही युवक किंवा युवती संधीपासून वंचित राहू नये, ही आमची बांधिलकी आहे,' असे ते म्हणाले.

वनराणी टॉय ट्रेन ही केवळ मनोरंजनासाठी नसून पर्यावरण आणि जैवविविधतेबद्दल जागरूकता निर्माण करण्याचे माध्यम आहे.

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात ई-बग्गी, ई-बस, सायकलिंग ट्रॅक, थीम गार्डन आणि सुधारित सफारी सुविधा विकसित करण्याचे कामही सुरू आहे.

मूळ वनराणी टॉय ट्रेन १९८० च्या दशकात डिझेल इंजिनवर सुरू झाली

ट्रॅक खराब झाल्यामुळे २००१ मध्ये सेवा बंद

२००४ मध्ये पुन्हा सुरू, नंतर देखभालीसाठी काही वेळा बंद

२०२१ तौक्ते चक्रीवादळामुळे पुन्हा बंद

आता बॅटरीवर चालणाऱ्या आधुनिक स्वरूपात पुनरागमन

कृष्णगिरी स्टेशनचे डिझाइन फुलपाखराच्या आकारात तयार केले जात आहे. येथे

प्रतीक्षागृह

तिकीट काउंटर

कर्मचाऱ्यांसाठी सुविधा

दिव्यांगांसाठी रॅम्प

यांची व्यवस्था असेल.

कृष्णगिरी स्टेशनजवळ टॉय ट्रेनसाठी स्वतंत्र लोको शेड तयार करण्यात आले आहे.

नव्या स्वरूपात सुरू झालेली वनराणी टॉय ट्रेन आता पुन्हा एकदा मुंबईतील मुलांसाठी, कुटुंबांसाठी आणि निसर्गप्रेमींसाठी खास आकर्षण ठरणार आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka