Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
'शिवाजीही आमचे आणि औरंगजेबही आमचे'

'शिवाजीही आमचे आणि औरंगजेबही आमचे'

अकोल्यात काँग्रेस नगरसेवकाचे वादग्रस्त वक्तव्य

कोला महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत काँग्रेस नगरसेवक आझाद खान यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

सभागृहात सुरू असलेल्या चर्चेदरम्यान 'शिवाजीही आमचेच आणि औरंगजेबही आमचेच' असे विधान त्यांनी केल्यानंतर भाजप नगरसेवकांनी तीव्र आक्षेप घेत घोषणाबाजी केली. या घटनेमुळे काही काळ सभागृहाचे कामकाजही ठप्प झाले.

मंगळवारी अकोला महापालिकेची सर्वसाधारण सभा पार पडत होती. शहरातील विविध विकासकामांसह कचरा संकलनासाठी घंटागाड्या खरेदी करण्याच्या विषयावर चर्चा सुरू होती. यावेळी काँग्रेस नगरसेवक आझाद खान यांनी चर्चेत भाग घेताना छत्रपती संभाजीनगरचा उल्लेख 'औरंगाबाद' असा केला. त्यावर भाजप नगरसेवकांनी तातडीने आक्षेप घेत अधिकृत नाव 'छत्रपती संभाजीनगर' वापरण्याची मागणी केली. मात्र, त्यावर प्रतिक्रिया देताना आझाद खान यांनी 'औरंगाबाद आणि संभाजीनगरमध्ये फरक काय? दोन्ही एकच आहेत,' असे म्हटले.

श्रीनगरमध्ये 'लष्कर'ची पोस्टर्स, शस्त्रे, दारुगोळ्यासह दोन जण अटकेत

या वक्तव्यानंतर सभागृहातील वातावरण अधिकच तापले. भाजप नगरसेवकांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. त्याचदरम्यान आझाद खान यांनी 'शिवाजीही आमचेच होते आणि औरंगजेबही आमचेच होते' असे विधान केले. हे वक्तव्य ऐकताच भाजप सदस्य संतप्त झाले. छत्रपती शिवाजी महाराजांचा संबंध औरंगजेबासारख्या आक्रमक शासकाशी जोडणे म्हणजे महाराष्ट्राच्या अस्मितेचा अपमान असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला.

सभागृहात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. भाजप नगरसेवकांनी आझाद खान यांच्या वक्तव्याचा निषेध करत त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. 'छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत. त्यांच्या नावाचा अवमान कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही,' अशी भूमिका भाजपच्या सदस्यांनी मांडली. वाढता गोंधळ पाहता अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करत परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर काही वेळाने सभेचे कामकाज पुन्हा सुरू करण्यात आले.

या घटनेचे पडसाद आता राजकीय वर्तुळात उमटू लागले आहेत. सोशल मीडियावरही या वक्तव्यावरून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. अनेकांनी आझाद खान यांच्यावर कठोर कारवाईची मागणी केली आहे. काही महिन्यांपूर्वीही अकोल्यात शिवाजी महाराजांच्या संदर्भातील वक्तव्यावरून वाद निर्माण झाला होता. त्यामुळे पुन्हा एकदा ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वांच्या नावावरून राजकीय संघर्ष पेटण्याची चिन्हे दिसत आहेत.

दरम्यान, काँग्रेस पक्षाकडून या प्रकरणावर अद्याप अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. मात्र भाजपने हा मुद्दा आक्रमकपणे उचलत काँग्रेसला धारेवर धरले आहे. अकोल्यातील या घटनेमुळे राज्याच्या राजकारणात नव्या वादाला तोंड फुटले असून पुढील काही दिवस हा मुद्दा अधिक गाजण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka