Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
'तिरंग्याचा मान उंचवा!'; भारतीय चमूला मोदींचा विजयमंत्र

'तिरंग्याचा मान उंचवा!'; भारतीय चमूला मोदींचा विजयमंत्र

NEWS डंका 1 month ago

कॉमनवेल्थ गेम्स २०२६ मध्ये सहभागी होणाऱ्या भारतीय पथकाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा देत खेळाडूंवर पूर्ण विश्वास व्यक्त केला आहे. ग्लास्गो येथे सुरू झालेल्या या बहुक्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडू जोश, जिद्द आणि उत्कृष्ट खेळाच्या बळावर देशाचा तिरंगा उंचावतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

पंतप्रधान मोदी यांनी 'एक्स'वरील संदेशात म्हटले, 'ग्लास्गो कॉमनवेल्थ गेम्स २०२६ ला सुरुवात होत आहे. भारतीय पथकाला मनःपूर्वक शुभेच्छा. आपल्या खेळाडूंचे कौशल्य, मेहनत आणि समर्पण हे नेहमीच कोट्यवधी भारतीयांसाठी प्रेरणादायी ठरले आहे. यंदाही ते सर्वोत्तम कामगिरी करतील, असा मला विश्वास आहे.'

ग्लास्गो येथे रंगारंग उद्घाटन सोहळ्याने स्पर्धेची सुरुवात झाली. किंग चार्ल्स तृतीय यांनी स्पर्धेचे अधिकृत उद्घाटन केले. २०१४ नंतर ग्लास्गोला पुन्हा एकदा कॉमनवेल्थ गेम्सचे यजमानपद मिळाले आहे.

परेड ऑफ नेशन्समध्ये भारताच्या पथकाचे नेतृत्व ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती मीराबाई चानू आणि ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती लव्हलिना बोरगोहेन यांनी केले. मीराबाई यांनी तिरंगा हातात घेतला, तर लव्हलिनाने समारंभातील कॉमनवेल्थ बॅटन वाहून नेली.

भारताने यंदा १२६ सदस्यांचे पथक पाठवले असून, पॅरा स्पोर्ट्ससह १३ क्रीडा प्रकारांमध्ये भारतीय खेळाडू आव्हान देणार आहेत. उद्घाटनापूर्वीच भारताच्या मोहिमेला सुरुवात झाली असून, लॉन बॉल्स संघाने पहिले आव्हान स्वीकारले. दरम्यान, लव्हलिना बोरगोहेनने उपांत्य फेरी गाठत भारतासाठी पहिले पदक निश्चित केले आहे.

भारताच्या पदकाच्या प्रमुख आशा नीरज चोप्रा (भालाफेक), मीराबाई चानू (वेटलिफ्टिंग) आणि लव्हलिना बोरगोहेन (मुष्टियुद्ध) यांच्यावर आहेत. ११ दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत ७४ राष्ट्रकुल देश आणि प्रदेशांतील खेळाडू विविध क्रीडा प्रकारांत पदकांसाठी जोरदार संघर्ष करणार आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka