पुणे : लोहगड किल्ल्यावरील केतन अग्रवाल हत्याकांडातील मुख्य आरोपी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी बचावासाठी एकमेकांवर गंभीर आरोप करत आहेत. यासोबतच खोटे दावेही करत आहेत. दरम्यान, हे लग्न ठरण्याआधीही सियाने काही गोष्टी खोट्या सांगितल्या असल्याचे आता समोर आले आहे.
सियाच्या संपूर्ण खोटेपणाचा पर्दाफाश करणारा मोठा खुलासा केतनचे वडील विशाल अग्रवाल यांनी केला आहे.
प्रसार माध्यमांनी जेव्हा विशाल अग्रवाल यांना विचारले की, "आरोपी सिया गोयलच्या पार्श्वभूमीमधून काही धक्कादायक माहिती समोर आली आहे का?" यावर उत्तर देताना केतनचे वडील म्हणाले, "जेव्हा केतन आणि सियाचे लग्न ठरत होते, तेव्हा आम्हाला सांगण्यात आले होते की सिया ही उच्चशिक्षित असून तिने कॉमर्सचे शिक्षण घेतले आहे. इतकेच नव्हे, तर ती स्वतःचा स्वतंत्र बेकरी व्यवसाय सुरू करणार असल्याचेही भासवण्यात आले होते. मात्र, आता पोलिस तपासात जी माहिती समोर आली आहे, ती ऐकून आम्ही थक्क आहोत. सिया ही केवळ १० वी पास असून चक्क १२ वी नापास आहे."
विशाल अग्रवाल यांनी पुढे सांगितले की, सिया केवळ शिक्षणाच्या बाबतीतच खोटी नव्हती, तर तिला दारू पिण्याची आणि इतर अनेक वाईट व्यसने जडली होती. तिच्या या उद्ध्वस्त करणाऱ्या वागण्यामुळे आणि छुप्या करतुतींमुळे तिचे स्वतःचे कुटुंब देखील प्रचंड त्रस्त झाले होते. त्यामुळेच एका चांगल्या आणि सुप्रतिष्ठित घरात तिचे लग्न लावून दिले, तर तिचे आयुष्य सुधारेल आणि ती स्थिर होईल, असा विचार तिच्या पालकांनी केला होता. याच कारणासाठी तिच्या पालकांनी केतनशी लग्न करण्यासाठी सियावर प्रचंड दबाव आणला होता.
सियाला जर केतनच्या विगमुळे किंवा बोलण्यामुळे लग्न करायचे नव्हते, तर तिने लग्नाला नकार का दिला नाही? ते म्हणाले, "तुम्ही संपूर्ण तपास प्रक्रियेत कुठेही पाहिलं, तरी सियाने या कारणावरून कधी लग्नाला नकार दिला होता, असं कुठेही समोर आलेलं नाही. जर तिला केतन आवडत नव्हता, तर लग्नाला नकार देणं खूप सोपं होतं. त्यासाठी माझ्या निष्पाप मुलाची इतक्या क्रूरपणे हत्या करण्याची काय गरज होती?" असा सवाल विशाल अग्रवाल यांनी केला आहे.

