रत्नागिरी ः प्रतिनिधी
काही दिवसांपूर्वी आरे समुद्रकिनारी पर्यटनासाठी आलेल्या दहिसर-मुंबईतील पर्यटक कुटुंबाला मारहाण व शिवीगाळ करत ठार मारण्याची धमकी देण्याऱ्या चार संशयितांच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या.
शनिवार 2 मे रोजी आरे येथील समुद्रकिनारी दहिसर येथून प्रविण हरिश्चंद्र कोरे (48,रा.मीठाघर रोड कांदरपाडा दहिसर पश्चिम मुंबई) हे आपल्या कुटुंबियांसह रत्नागिरीत पयर्टनासाठी आले होते. ते आरे समुद्रकिनारी जात असताना कार नंबर (एमएच-46-डीए-9784) आणि कार नंबर (एमएच-46-सीई-7485) मधील चार अज्ञातांनी फिर्यादीच्या गाडीसमोर आपल्या गाड्या वाकड्या तिकड्या चालवून त्यांना पुढे जाण्यासाठी अडथळा केला होता.
त्यानंतर चारही संशयितांनी फिर्यादी आणि कुटुंबियांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. फिर्यादीने त्यांना याबाबत जाब विचारला असता संशयितांनी फिर्यादीला त्याच्या पत्नीला आणि पुतण्याला मारहाण करत चाकू दाखवून ठार मारण्याची धमकी दिली होती. याप्रकरणी फिर्यादीने ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. तक्रारीवरुन भारतीय न्याय संहिता कलम 126(2),115(2),351(2),352,131,324(4),3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दरम्यान,ही घटना पर्यटकांच्या सुरक्षिततेला व जिल्ह्याच्या पर्यटनाला बाधा पोचविणारी असल्याने या घटनेचे गांभिर्य विचारात घेउन पोलिस अधिक्षक नितीन बगाटे, अपर पोलिस पोलिस अधिक्षक बी.बी.महामूनी यांच्या आदेशाने रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाण्याचे पथक पनवलेला पाठवण्यात आले होते. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे या गुन्ह्यातील 4 ही संशयित आरोपींना 48 तासांच्या पनवेलमधून ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजेंद्र यादव, पोलिस उपनिरीक्षक अभय तेली आणि पोलिस काँस्टेबल अजिंक्य पवार यांनी केली आहे.

