देवरूख (प्रतिनिधी):
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील बावनदी येथील जुन्या पुलावरून रेवाळेवाडी (ता. संगमेश्वर) येथील एका तरुणाने आज शुक्रवारी सकाळी सुमारे ९.३० वाजण्याच्या सुमारास थेट नदीत उडी मारून जीवनयात्रा संपवण्याचा प्रयत्न केला आहे.
या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या तरूणाचा शोध घेतला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बावनदीच्या जुन्या पुलावर हा तरुण संशयास्पद स्थितीत उभा असल्याचे तेथून जाणाऱ्या नागरिकांच्या लक्षात आले. तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी त्याला रोखण्याचा आणि वाचवण्याचा अटोकाट प्रयत्न केला. मात्र, काही क्षणांतच त्याने नदीच्या पात्रात उडी घेतली. अचानक घडलेल्या या घटनेने उपस्थितांची प्रचंड धावपळ झाली. घटनेची माहिती मिळताच संगमेश्वर पोलिसांनी तात्काळ बावनदी पुलावर धाव घेतली. स्थानिक नागरिक आणि पोलीसांच्या मदतीने नदीपात्रात तरुणाचा शोध घेण्याचे काम वेगाने सुरू करण्यात आले आहे. तरूणाने हे टोकाचे पाऊल का उचलले, याचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. पोलीस या घटनेचा सर्व बाजूंनी तपास करत आहेत. या घटनेची बातमी वाऱ्यासारखी पसरताच बावनदी परिसरात नागरिकांची मोठी गर्दी जमली असून, परिसरात अत्यंत चिंतेचे व हळहळीचे वातावरण पसरले आहे.

