Dailyhunt
एअर इंडियाच्या फ्लाइटला उशीर; प्रवाशांना तासन्‌तास विमानातच बसून त्रास

एअर इंडियाच्या फ्लाइटला उशीर; प्रवाशांना तासन्‌तास विमानातच बसून त्रास

दिल्लीहून पुण्याकडे येणाऱ्या एअर इंडियाच्या फ्लाइटमध्ये प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला. तांत्रिक बिघाडामुळे उड्डाण उशिरा झाले आणि सुमारे तीन तास प्रवाशांना विमानातच बसून राहावे लागले.

या दरम्यान प्रवाशांना वारंवार विमानातून उतरवून पुन्हा चढवण्यात आले. एसी नीट कार्यरत नसल्याने आणि माहिती न दिल्याने प्रवाशांमध्ये नाराजी वाढली. अखेर पहाटे उड्डाण होऊन विमान पुण्यात पोहोचले.

पुणे :दिल्लीहून पुण्याकडे येणाऱ्या एअर इंडियाच्या AI-2609 फ्लाइटमधील सुमारे १०० प्रवाशांनामंगळवारी रात्री उशिरा मोठा त्रास सहन करावा लागला. हे उड्डाण रात्री ११.५० वाजता सुटणार होते, मात्र तांत्रिक अडचणीमुळे उशीर झाला आणि प्रवाशांना दीर्घकाळ विमानातच बसून राहावे लागले.

प्रवाशांच्या माहितीनुसार, सुरुवातीला बोर्डिंग पूर्ण झाल्यानंतर पायलटने तांत्रिक बिघाड असल्याचे सांगितले. त्यानंतर एसी नीट काम करत नसल्यामुळे विमानात उष्णता वाढली आणि प्रवाशांना अस्वस्थता जाणवू लागली. केबिन क्रूकडून स्पष्ट माहिती न दिल्यामुळे तणाव अधिक वाढला.

सुमारे रात्री १२.५५ च्या सुमारास सर्व प्रवाशांना विमानातून उतरवण्यात आले आणि टर्मिनलमध्ये नेण्यात आले. काही वेळानंतर पुन्हा सुरक्षा तपासणीनंतर बोर्डिंग करण्यास सांगण्यात आले. थकलेले आणि झोपेत असलेले प्रवासी पुन्हा विमानात चढले, मात्र उड्डाण पुन्हा विलंबित झाले.

पहाटे २.३० पर्यंत बोर्डिंग पूर्ण झाले आणि प्रवाशांना उड्डाण होईल अशी अपेक्षा होती. मात्र विमानाने तत्काळ उड्डाण न घेतल्याने प्रवाशांनी केबिन क्रूला विचारणा केली, परंतु त्यांच्याकडे ठोस माहिती नव्हती. एटीसीकडून परवानगी मिळण्याची प्रतीक्षा असल्याचे सांगण्यात आले.

अखेरीस पहाटे सुमारे ३.१५ वाजता विमानाने टॅक्सी सुरू केली आणि सकाळी सुमारे ५ वाजता पुण्यात लँडिंग झाले. या प्रकारामुळे प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात आली. दरम्यान, एअर इंडियाच्या प्रवक्त्याशी संपर्क साधला असता त्यांचे उत्तर मिळाले नाही, असे प्रहार डिजिटल वृत्तात नमूद करण्यात आले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Prahaar Digital