राजापूर (प्रतिनिधी): राजापूर नगरपरिषदेचे हे शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. या निमित्त राजापूरच्या अभिमानाची १५० वर्षे या उपक्रमांतर्गत राजापूर नगर परिषदेच्या वतीने वर्षभर विविध उपक्रम राबविले जात आहेत.
याच उपक्रमांतर्गत या वर्षभरात शहरात विविध भागात पंधरा हजार वृक्ष लागवडीचा संकल्प हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यात १५०० वृक्ष लागवडीचा शुभारंभ शनिवारी १ ऑगस्ट २०२६ छत्रपती शिवाजी महाराज पथ येथील नवजीवन हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या मागील परिसरात उत्साहात करण्यात आला. या वृक्षारोपण कार्यक्रमाचा शुभारंभ लोकनियुक्त नगराध्यक्षा ॲड. हुस्नबानू खलिफे यांच्या हस्ते झाला, यावेळी नवजीवन व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य राजेंद्रकुमार व्हनमाने उपस्थित होते.
याप्रसंगी लावण्यात आलेल्या वृक्षांचे संगोपन व नियमित देखभाल करण्याची जबाबदारी नवजीवन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय या संस्थेकडे सोपविण्यात आली असून, संस्थेने ही जबाबदारी आनंदाने स्वीकारली आहे. यावेळी बोलताना नगराध्यक्षा ॲड. खलिफे यांनी सांगितले पुढील टप्प्यातील वृक्षारोपण शहरातील विविध शाळा, महाविद्यालये व सामाजिक संस्थांच्या परिसरात करण्यात येणार असून त्या-त्या संस्थांकडे वृक्षांच्या संगोपनाची जबाबदारीही सोपविण्यात येईल. त्यामुळे वृक्षारोपणाबरोबरच त्यांचे संवर्धनही प्रभावीपणे होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या प्रसंगी नगरसेवक जमीर खलीफे, सुलतान ठाकूर, सौरभ पेणकर, सुबोध पवार, दिलीप चव्हाण, सौरभ खडपे, नगरसेविका सानवी रावण, प्रेरणा नार्वेकर, साजिया काझी, शबाना मुल्ला, अमिना गडकर, जान्हवी वादक,. सुयोगा जठार, नेहा तानवडे, उर्मिला बाकाळकर, तसेच अजीम जैतापकर यांच्यासह नगरपरिषदेचे अधिकारी, कर्मचारी आणि नवजीवन हायस्कुल व व कनिष्ठ महाविद्यालयाचें प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राजापूर नगरपरिषदेच्या १५० व्या वर्षानिमित्त राबविण्यात येणारा हा १५००० वृक्ष लागवडीचा उपक्रम शहराच्या पर्यावरण संवर्धनासाठी महत्त्वपूर्ण ठरणार असून नागरिकांनीही या अभियानात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

