Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
साडेसात महिन्यांनंतर भर पावसात राजापूरची गंगा पुन्हा प्रवाहित; भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण

साडेसात महिन्यांनंतर भर पावसात राजापूरची गंगा पुन्हा प्रवाहित; भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण

राजापूर प्रतिनिधी :सुमारे साडेसात महिन्यांच्या प्रदीर्घ विश्रांतीनंतर राजापूरची ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व असलेली गंगामाई भर पावसाळयात पुन्हा प्रवाहित झाली आहे. गुरुपौर्णिमेनंतर मूळ गोमुखातून सुरू झालेला प्रवाह आता वेगाने वाहू लागल्याने परिसरातील इतर कुंडांमध्येही मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे.

मुळ गंगा, गोमुख यांसह गंगास्थानाच्या अन्य सर्व कुंडामध्ये गंगामाई वेगाने प्रवाहीत झालेली असल्याने भाविकांना गंगास्नानाची पर्वणी साधण्याची संधी मिळाली आहे.
त्यामुळे राजापूर गंगा परिसरात पुन्हा एकदा भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून भाविकांची दर्शनासाठी गर्दी वाढू लागली आहे.
आगमन अन् निर्गमनाचे कोड सोडविण्याचे विज्ञानालाही आव्हान ठरलेल्या गंगामाईचे गेल्या काही वर्षामध्ये सातत्याने आगमन अन् तीर्थक्षेत्री वास्तव्य राहीलेले आहे. गतवर्षी म्हणजे डिसेंबर २०२५ मध्ये गंगेचे निर्गमन झाले होते. त्यावेळी गंगामाईच्या वास्तव्याच्या काळामध्ये राज्यासह राज्याबाहेरील लाखो भाविकांनी गंगास्नानाची पर्वणी साधली होती. त्यानंतर, आता गंगामाईचे तब्बल साडेसात महिन्यांच्या कालावधीनंतर पुन्हा एकदा उन्हाळे तीर्थक्षेत्री आगमन झाले आहे. आगमनानंतर मुळगंगेसह चंद्रकुंड, सुर्यकुंड, बाणकुंड, यमुनाकुंड, सरस्वतीकुंड, गोदावरी कुंड, अग्नीकुंड, भीमाकुंड, चंद्रभागाकुंड अशी सर्व कुंड पाण्याने भरली आहेत. तर, काशी कुंडातील गंगाजल गोमुखातून प्रवाहीतही राहीलेले आहे. गंगामाईच्या या प्रवाहित वास्तव्याच्या काळामध्ये गंगास्नानाची पर्वणी साधण्यासाठी भाविकांसह पर्यटकांची पावले आता गंगातीर्थक्षेत्राकडे वळू लागली आहेत.
गंगामाई आणि श्रीदेव शंकराचे अतूट नाते मानले जाते. त्यातच, व्रतवैकल्यांचा मास म्हणून ओळखला जात असलेल्या श्रावण महिन्याच्या सोमवारी गंगाजलाने श्रीदेव धुतपापेश्‍वरला अभिषेक घालण्याला विशेष महत्व आहे. त्यामध्ये गंगा स्नानानंतर तालुक्याचे आराध्य दैवत म्हणून ओळखल्या जाणार्‍या श्री देव धूतपापेश्वरांचे दर्शन घेऊन गंगेचे पाणी आणि धोपेश्‍वर येथील मृडानी नदीच्या कोटीतीर्थातील पाणी घेवून त्याच्या सहाय्याने श्री धूतपापेश्वरांच्या पिंडीवर अभिषेक करण्याचा प्रघात आहे. त्यामुळे गंगास्नानानंतर अनेक भाविक श्री धूतपापेश्वर मंदीरात दर्शनासाठी जातात. गंगामाईच्या सध्या असलेल्या वास्तव्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये सुरू होणार्‍या श्रावण महिन्यातील श्री देव धुतपापेश्‍वरला गंगास्नानाचा अभिषेक घालण्याची सुवर्णसंधीही भाविकांना मिळणार आहे.
राजापूर गंगा हे कोकणातील एक अद्वितीय नैसर्गिक आश्चर्य मानले जाते. धार्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक दृष्ट्या या स्थळाला विशेष महत्त्व आहे. पूर्वी गंगामाईचे आगमन ठराविक कालावधीत होत असे. डिसेंबर किंवा जून महिन्यात प्रकट होऊन ती दोन ते आठवडे प्रवाहित राहत असे. त्यानंतर पुन्हा तीन वर्षांनी गंगामाईचे आगमन होण्याची परंपरा होती. मात्र गेल्या दोन दशकांत या चक्रात मोठा बदल झाल्याचे दिसून येत आहे.
पूर्वी गंगामाईच्या आगमनामुळे देशभरातून हजारो भाविक राजापूरमध्ये दाखल होत असत. स्थानिक व्यापाऱ्यांनाही मोठा आर्थिक लाभ होत असे. मात्र आता गंगामाईचे आगमन वारंवार होत आहे. त्यामुळे या नैसर्गिक घटनेमागील भूगर्भशास्त्रीय, जलशास्त्रीय आणि पर्यावरणीय कारणांचा सखोल अभ्यास करण्याची गरज तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Prahaar Digital