नळपाणी योजनेच्या अर्धवट कामामुळे अपघातांची मालिका
सावंतवाडी :येथील नवसरणी परिसराजवळ नगरपरिषदेच्या माध्यमातून सुरू असलेल्या नळपाणी योजनेच्या कामामुळे वाहनधारकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
रविवारी सकाळी रस्त्याचा अंदाज न आल्याने एक चारचाकी कार थेट गटारात कलंडल्याची घटना घडली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी या निष्काळजीपणामुळे नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
अपघात घडताच परिसरातील सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांमुळे गटारात फसलेली कार सुखरूप बाहेर काढण्यात आली. मात्र, या अपघातामुळे वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे.
*आतापर्यंत ४ अपघात : प्रशासनाविरोधात नाराजी*
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, या धोकादायक ठिकाणी आतापर्यंत जवळपास ४ अपघात झाले आहेत. शहरात ठिकठिकाणी ठेकेदारांनी कामासाठी खोदलेले खड्डे आणि अर्धवट कामे यामुळे अपघातांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. या पार्श्वभूमीवर नगरपरिषद प्रशासनाच्या ढिसाळ आणि बेजबाबदार कारभाराविरोधात नागरिकांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे.

