महामानवांच्या विचारकार्याचे नियोजनबद्ध संशोधन व्हावे: मंत्री प्रकाश आबिटकर
प्रतिनिधी /रोहन कांबळे
कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठामध्ये कोल्हापूर जिल्हा नियोजन व विकास समितीच्या आर्थिक सहकार्यातून बांधण्यात आलेल्या 'शरण साहित्य अध्यासना'च्या' नूतन इमारतीचे लोकार्पण आणि उद्घाटन पालकमंत्री प्रकाश आबिटकर,मंत्री हसन मुश्रीफ,आमदार सतेज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.
शिवाजी विद्यापीठाच्या विविध अध्यासनांची उभारणी आणि विस्तार यासाठी शासन सर्वतोपरी सहकार्य करण्याच्या भूमिकेत आहे. त्यामुळे महामानवांचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचण्याच्या दृष्टीने तेथे त्यांच्या विचार कार्याचा नियोजनबद्ध अभ्यास आणि संशोधन व्हावे अशी अपेक्षा महाराष्ट्राचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी व्यक्त केले. शिवाजी विद्यापीठामध्ये कोल्हापूर जिल्हा नियोजन व विकास समितीच्या आर्थिक सहकार्यातून बांधण्यात आलेल्या शरण साहित्य अध्यासनाच्या नूतन इमारतीचे लोकार्पण आणि उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते.मंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले शिवाजी विद्यापीठामध्ये शरण्य अध्यासनाच्या बरोबरीनेच महावीर अध्यासन, लोकनेते बाळासाहेब देसाई अध्यासन, तसेच कैलासवासी डॉ.ग.गो.जाधव अध्यासन इत्यादी कार्यरत असून त्यांनाही शासनाच्या माध्यमातून वेळोवेळी आर्थिक सहकार्य करण्याची भूमिका राहिलेली आहे.
शरण साहित्य अध्यासन इमारतीच्या पुढील टप्प्याला गतिमानता देण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न केले जातील. महात्मा बसवेश्वरांचे उत्तुंग कार्य आणि प्रेरक विचार यांचा सर्वदूर प्रसार होण्याच्या दृष्टीने सार्वत्रिक प्रयत्नांची गरज असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
यावेळी आमदार सतेज पाटील यांनी बसवेश्वरांचे विचार जागतिक पातळीवर नेण्यासाठी या अध्यसनाच्या दुसऱ्या टप्प्याला गती देण्यासाठी शासनाने सहकार्य करावे अशी पेक्षा व्यक्त केली.
मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले महात्मा बसवेश्वर हे युगप्रवर्तक क्रांतीकारक होते. नितीमुलांवर चालणारा समाज त्यांना अभिप्रेत होता. त्यासाठी त्यांनी मोठा त्याग केला. त्यांचे जीवन चरित्र आणि कार्य यांच्यावर विद्यापीठात मोठे संशोधन कार्य व्हावे आणि त्याला भरीव सामाजिक पाठबळ लाभावे अशी अपेक्ष त्यांनी व्यक्त केली.
कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांनी शरण सहित्यामधील समता आणि धर्मनिरपेक्षता या मूल्यांचे जतन व संवर्धन करण्याच्या दृष्टीने शिवाजी विद्यापीठ प्रयत्नशील राहील,याची ग्वाही दिली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मंत्री आबिटकर आणि मुश्रीफ यांच्या हस्ते कोनशिलेचे अनावरण आणि फित सोडवून इमारतीचे उद्घाटन करण्यात आले.अधिसभा सदस्य ॲड.अभिषेक मिठारी,सूर्यकांत पाटील-बुध्याळकर यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी यश आंबोळे यांनी सूत्रसंचालन केले.तर कुलसचिव डॉ.विलास शिंदे यांनी आभार मानले. यावेळी प्र-कुलगुरू डॉ.ज्योती जाधव यांच्यासह अध्यासनाच्या समन्वयक डॉ.तृप्ती करेकट्टी, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ.अजितसिंह जाधव,विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा अधिष्ठाता डॉ.राजाराम गुरव, चन्नबसवानंद स्वामीजी, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ.रघुनाथ धमकले, रजनीताई मगदूम, डॉ.जी.पी.माळी,सरलाताई पाटील, डॉ.गिरीश कुलकर्णी, राजेश पाटील चंदुरकर,मल्लाप्पा चौगुले, वास्तु विशारद जीवन बोडके, अभियंता रणजीत यादव यांच्यासह अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित.

