- राज्यासह गोवा-कर्नाटकातूनही वाढली मागणी
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्याची ओळख आता केवळ निसर्गसौंदर्यापुरती मर्यादित राहिलेली नाही. येथील दर्जेदार आंबा आणि काजूच्या रोपांनीही राज्यभरात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
पावसाळ्याला सुरुवात होताच जिल्ह्यातील नर्सरी व्यवसायाला खऱ्या अर्थाने बहर येतो. हापूस आंबा, वेंगुर्ला जातीचा काजू, नारळ, कोकम तसेच विविध फुलझाडांच्या रोपांच्या खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी होत आहे.
वर्षभराच्या अथक परिश्रमातून आणि योग्य हवामानाचा लाभ घेत सिंधुदुर्गातील नर्सरी व्यावसायिक दर्जेदार रोपांची निर्मिती करतात. कलमांची खात्रीशीर जात, उच्च गुणवत्ता आणि जगण्याचे अधिक प्रमाण यामुळे या रोपांवर शेतकऱ्यांचा मोठा विश्वास आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांसह शेजारील गोवा आणि कर्नाटक राज्यांमधूनही शेतकरी मोठ्या प्रमाणात सिंधुदुर्गात दाखल होत आहेत.
वाढत्या मागणीमुळे नर्सरी व्यवसायाला चालना मिळत असून स्थानिक स्तरावर रोजगाराच्या संधीही निर्माण होत आहेत. यासोबतच जिल्ह्याच्या अर्थकारणाला बळकटी मिळत असून सिंधुदुर्गची कृषी क्षेत्रातील ओळख अधिक दृढ होत आहे.

