सुमन कल्याणपूर यांचे निधन; सुरसम्राज्ञीचा स्वर कायमचा थांबला
मुंबई, ३१ मे : मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ पार्श्वगायिका यांचे रविवारी (३१ मे) वयाच्या ८९व्या वर्षी निधन झाले.
त्यांच्या निधनाने संगीतविश्वावर शोककळा पसरली असून चाहत्यांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
२८ जानेवारी १९३८ रोजी ढाका (आताचा बांगलादेश) येथे जन्मलेल्या सुमन कल्याणपूर यांनी आपल्या मधुर, सोज्वळ आणि सुरेल आवाजाने अनेक दशकं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. लग्नापूर्वी त्यांचे नाव सुमन हेमाडी होते. शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी १९५४ मध्ये चित्रपटसृष्टीत पार्श्वगायनाला सुरुवात केली.
सुमन कल्याणपूर यांनी मराठी, हिंदीसह पंजाबी, गुजराती, बंगाली, असामी, कन्नड, भोजपुरी आणि ओडिया भाषांमध्येही गाणी गायली. मराठी भावगीते, भक्तिगीते, अंगाईगीते आणि चित्रपट गीतांमधून त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. 'जिथे सागरा धरणी मिळते', 'केतकीच्या बनी तेथे नाचला ग मोर', 'केशवा माधवा', 'निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला' यांसारखी अनेक गाणी आजही रसिकांच्या ओठांवर आहेत.
हिंदी चित्रपटसृष्टीतही त्यांनी 'न तुम हमें जानो', 'तुमने पुकारा और हम चले आये', 'मेरे महबूब ना जा', 'दिल ने फिर याद किया' यांसारख्या अजरामर गीतांना आवाज दिला. त्यांच्या आवाजाची तुलना अनेकदा यांच्याशी करण्यात आली, मात्र सुमनताईंनी आपल्या वेगळ्या शैलीने रसिकांची मने जिंकली.
तब्बल ७४० चित्रपटांसाठी पार्श्वगायन करणाऱ्या सुमन कल्याणपूर यांना विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले होते. त्यांना मध्य प्रदेश शासनाचा लता मंगेशकर पुरस्कार तसेच भारत सरकारचा पद्मभूषण सन्मानही प्राप्त झाला होता.
सुमन कल्याणपूर यांच्या निधनाने भारतीय संगीत क्षेत्रातील एक सुवर्णपर्व संपले असून त्यांच्या स्वरांची मोहिनी मात्र कायम रसिकांच्या स्मरणात राहणार आहे. त्यांच्या पश्चात कुटुंबीय, असंख्य चाहते आणि संगीतप्रेमी असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाबद्दल विविध क्षेत्रांतून शोकसंवेदना व्यक्त केल्या जात आहेत.

